तुम्हाला माहितीये का; टायफाईडचीही लस असते? आठ शहरांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर

तुम्हाला माहितीये का; टायफाईडचीही लस असते? आठ शहरांच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर


मुंबई : मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये टायफाॅईड हा आजार आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल बहुतांश लोकांना माहितीच नसल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. टायफॉईड हा तितकासा गंभीर आजार नाही. तो सौम्य असून त्यावर सहजपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे मत अनेकांनी सर्वेक्षणात नोंदवले आहे. पाच ते पंधरा वयोगटातील मुलांना या टायफाॅईडचा धोका अधिक असतो. त्यावर लसीकरण हाच चांगला उपचार आहे. मात्र, फक्त 66 टक्के नागरिकांनाच या लसीकरणाची माहिती असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. देशातील आठ शहरांमध्ये अँबॉट ही औषध कंपनी आणि बेबीगोगो या संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले.    

विशेष म्हणजे 2016 मध्ये देशात टायफॉईडचे 22 लाख रुग्ण नोंदविण्यात आले होते. जगाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक होते. 2017 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 78 हजार जणांना या रोगाचा संसर्ग झाला होता. तरीदेखील अजूनही नागरिकांमध्ये या आजाराबाबत फारशी माहिती नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातील रोटाव्हायरस या लसीबाबत 82 टक्के लोकांना माहिती आहे. त्यातुलनेत फ्ल्यू व टायफॉईड यांच्या लसींबाबत जेमतेम 66 ते 67 टक्के लोकांना माहिती आहे. दुर्लक्ष केल्यास जीवाणुसंसर्गामुळे गंभीर आजार होऊ शकतो, याचीही या नागरिकांना कल्पना नव्हती. मुलांच्या डॉक्टरकडून या लशीची शिफारस होत नाही, असे कारण 48 टक्के लोकांनी दिली. तर, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाच्या यादीत या लसीचा समावेश नाही, हे कारण 36 टक्के लोकांनी दिले. 

जगाच्या तुलनेत भारतीय उपखंडामध्ये टायफॉईड या आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. अस्वच्छ पाणी, दूषित अन्न यातून हा जंतूसंसर्ग होतो, असे डॉक्टर सांगतात. पण वातावरणातील बदलामुळे टायफॉईड होतो, असे 57 टक्के लोकांना वाटते. दीर्घकाळ येणारा ताप, डोकेदुखी, मळमळ, भूक न लागणे, बद्धकोष्ठता किंवा अतीसार ही त्याची लक्षणे आहेत. याबाबतही अनेकांना माहिती नव्हती. 

लस घेण्यापेक्षा आजार होऊ देऊ! 
सर्वेक्षणातून समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे टायफाॅईड आजाराला प्रतिबंध म्हणून लस घेण्यापेक्षा हा आजार होण्याचा धोका आम्ही पत्करू असे, 13 टक्के नागरिकांनी सांगितले. अशा स्थितीत मुलांच्या लसीकरणाबाबत पालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे बालरोगतज्ज्ञ विजय येवले म्हणाले. तर, या सर्वेक्षणामुळे लसीकरणाच्या उपयुक्ततेचे महत्व अधोरेखित झाले, असे अँबॉट इंडियाच्या संचालक डॉ. श्रीरुपा दास म्हणाल्या.

़-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com