प्रदीर्घ लढ्यानंतर उसाचे ३१ लाख रुपये खात्यावर जमा

file photo
file photo

नांदेड - महाराष्ट्र शुगर (जि. परभणी) या खासगी कारखान्याने २०१५ - २०१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नव्हते. याबाबत शेतकऱ्यांनी चार वर्ष दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर गुरुवारी (ता. २२ आक्टोंबर) ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ लाख रुपये जमा झाले आहेत. ‘‘ही टोकण रक्कम आहे, पूर्ण ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना मिळवून देईपर्यंत संघर्ष सुरूच राहील’’ असे ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले. 

सोनखेड तालुक्यातील (जि. परभणी) महाराष्ट्र शुगर या खासगी कारखान्याने २०१५ - २०१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील पाचशे शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नाही. यानंतर हा कारखाना परस्पर विकला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी हा विषय मंडळाच्या अनेक बैठक काळात लावून धरला. 

कारखान्यावर रेकॉर्ड नव्हते
कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली, अनेक वेळा लिलाव करण्यात आले परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. त्यानंतर भोकर येथील शेतकरी गोविंद गोपालपल्ले यांनी कारखान्याच्या अध्यक्षा विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. न्यायालयाने अध्यक्षाला पन्नास लाख रुपये अनामत ठेवण्याच्या अटीवर जमानत झाली. अध्यक्षाने कारखान्यावर रेकॉर्ड ठेवले नव्हते. कारखान्याकडे असलेले चार कोटी २२ लाख रुपये कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचेत हे प्रशासनाला माहीत नव्हते. 

शेतकऱ्यांच्या वारसदाराचे अर्ज प्राप्त 
इंगोले यांच्या सूचनेवरून नवीन रेकॉर्ड तयार करण्याची प्रक्रिया झाली. शेतकऱ्यांकडे असलेल्या पावत्या जमा करून त्याआधारे नवीन रेकॉर्ड तयार करण्यात आले. त्याची खातरजमा करून चार कोटी २२ लाखांपैकी कारखान्याच्या अध्यक्षाने जमानती पोटी भरलेले ५० लाख रुपयातून ३१ लाख रुपयांचे वाटप करण्यात येत आहे. रेकॉर्डनुसार ४५९ शेतकऱ्यांचा ऊस गेला. त्यापैकी ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ लाख रुपये जमा करण्यात आले. तर पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी केलेल्यापैकी शहानिशा करून ७६ शेतकऱ्यांचे पैसे सस्पेन्समध्ये ठेवण्यात आले आहेत. ऊस गेलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदाराचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांना वारस असल्याच्या पुरावा देण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. यानंतर अशा शेतकऱ्यांना पैसे देण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) एल. बी. वांगे यांनी दिली. 

प्रदीर्घ लढ्यानंतर यश
महाराष्ट्र शुगर कारखान्याकडील थकित एफआरपी प्रदिर्घ लढ्यानंतर मिळाला आहे. यानंतर शिल्लक एफआरपी व विलंब व्याजाची रक्कमही वसूल करु. तसेच भाऊराव चव्हाण कारखान्याकडे असलेले व्याज व थकित बाकी वसूल करणार आहोत.
- प्रल्हाद इंगोले, याचिकाकर्ते नांदेड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com