नांदेड जिल्ह्यात ९१० ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरू; १०३ ग्रामपंचायती बिनविरोध 

file photo
file photo

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील एक हजार १३ ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाली होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. चार) जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. त्यामुळे आता ९१० ग्रामपंचायतीसाठी चिन्ह वाटपानंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.
 
नांदेड जिल्ह्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती असून त्यापैकी एक हजार १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानंतर ता. २३ डिसेंबर ते ता. ३० डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील जांब बुद्रुक (ता. मुखेड) व आलेगाव (ता. कंधार) दोन ग्रामपंचायती वगळता एक हजार १३ ग्रामपंचायतीसाठी २३ हजार ९६१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 

२३ हजार ९६१ अर्ज झाले होते दाखल
नांदेड जिल्ह्यातील एक हजार १५ ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाली. त्यातील जांब बुद्रुक (ता. मुखेड) व आलेगाव (ता. कंधार) या दोन ग्रामंपचायतीचा कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे आता एक हजार १३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणुकांसाठी ता. २३ ते ता. ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याची तारीख होती. या काळात जिल्ह्यातील १६ तालुक्यातून २३ हजार ९६१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. यात सर्वाधीक मुखेड तालुक्यातून १०८ ग्रामपंचायतीसाठी तीन हजार १२ अर्जांचा समावेश होता. ता. ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी झाली तर सोमवारी (ता. चार) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुक चिन्हाचे वाटप करण्यात आले. यानंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. 

१०३ ग्रामपंचायती बिनविरोध
दरम्यान, जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. तर काही ठिकाणी सदस्यपदही एकच अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवडले गेले आहेत. सोमवारी (ता. चार) निवडणुक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर लगेच पॅनल प्रमुखांनी प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवात केली आहे. अनेक गावात तरुणांनी प्रस्थापितांना आव्हान दिल्यामुळे कडवी झुंज पहायला मिळत आहे. जिल्ह्यात ता. १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी ता. १८ जानेवारी रोजी होणार आहे. यानंतर गावाचे कारभारी ठरणार आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत वाड्याला आले महत्त्व ; एका एका मतांची होतीय जुळवा जुळव 
 
तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायती 

जिल्ह्यात १६ तालुके असून त्यापैकी माहूर वगळता इतर १५ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. त्यात नांदेड - सात, अर्धापूर - सहा, भोकर - बारा, मुदखेड - पाच, हदगाव - १३, हिमायतनगर - तीन, किनवट - दोन, माहूर - शून्य, धर्माबाद - तीन, बिलोली - चार, नायगाव - पाच, देगलूर - आठ, मुखेड - सहा, कंधार - तेरा, लोहा - सात. 
 
पक्ष आणि नेतेमंडळींचे लक्ष 
दरम्यान, या निवडणुकींवर विविध पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी लक्ष ठेऊन आहेत. काही जणांनी आपआपले पॅनल उभे केल्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी पॅनेलच्या लढती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामिण भागात येत्या आठ ते दहा दिवसात प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com