नांदेड : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर पोस्ट करून चव्हाण यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, ‘मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे तूर्त जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याचा प्रकार धक्कादायक आहे.
हा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे. पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. ऊर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काय संबंध? हे पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा’.
दबावाला बळी न पडता पाणी सोडा
उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ च्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणीटंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
अशोक चव्हाणांच्या नावे आरक्षणाबाबत खोटी पत्रे
मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपल्या नावे दोन बनावट पत्रे तयार करण्यात आल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांना दिली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असतानाच्या काळात कोरे लेटरपॅड तयार करून त्यावर आपल्या नावाची बनावट पत्रे लिहिण्यात आल्याचे चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
त्यांच्या नावे बनावट पत्रांचा पहिला प्रकार सुमारे नऊ महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेले ते बनावट पत्र मराठा आरक्षणाविषयी होते. त्याबाबत त्यांनी २० फेब्रुवारीला पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. दरम्यान, संबंधित व्यक्तींनी पुन्हा अशी दोन बनावट पत्रे तयार केली आहेत. त्यातील एक पत्र मराठा तर दुसरे पत्र धनगर आरक्षणाबाबत आहे. या दोन्ही खोट्या पत्रांमध्ये माझी भूमिका आरक्षणाविरोधी भासवण्यात आल्याचे चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.