नांदेड : सततची नापिकी आणि आणि बँक व खाजगी काढलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पानशेवडी (ता. कंधार) शिवारात शनिवार (ता. 24) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की पानशेवडी येथील शेतकरी विलास नामदेव मोरे यांच्या शेतामध्ये मागील काही दिवसापासून सतत नापिकी होत होती. यावर्षी अतिवृष्टी झाल्याने पुन्हा नापिकी झाली. त्यामुळे प्रपंच चालवण्यासाठी त्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कंधार, महिंद्रा फायनान्स, ग्रामीण कोटा फायनान्स आणि भारत फायनान्स या खाजगी फायनान्सकडूनही कर्ज घेतले होते. परंतु शेतातच नापिकी झाल्याने या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत तो मागील काही दिवसापासून वावरत होता. कर्जाचा डोंगर वाढत जात असतांना हाताला काम नाही आणि शेतात सततची नापिकी यामुळे तो अधीकच खचुन गेला.
हेही वाचा - कोरोना, अतिवृष्टी व आर्थिक अडचणीतही दसरा उत्सवाची धामधूम -
कंधार पोलिस ठाण्यात नोंद
या परिस्थितीला तोंड देऊ शकत नसल्याने शेवटी त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी ते आपल्या शेतावर गेले. उघड्या बोडक्या झालेल्या शेतावर त्याने आपली नजर फिरवली आणि बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना सायंकाळी समजतातच त्यांनी शेताकडे धाव घेतली. कंधार पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कंधार पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरला व उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लोहा येथे पाठविला. सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरा सदर शेतकऱ्याचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. कुलदीप मोरे याच्या माहितीवरून कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस श्री गुट्टे करत आहेत.
येथे क्लिक करा - नांदेड : रेणुका मंदिरात ४७ लाखांचा अपहार, माजी संचालकांवर गुन्हा दाखल -
गांजाची लागवड करणारा शेतकरी पोलिस कोठडीत
नांदेड : लोहा तालुक्यातील पोलेवाडी येथील राहुलअप्पा उर्फ बाबू शिवराम पोले (वय ६०) यांनी आपल्या कापसाच्या शेतात गांजाची झाडे लावली होती. ही माहिती माळाकोळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्रोबा घाटे यांना मिळाली. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन राहूलअप्पा पोले यांच्या शेतावर छापा टाकला. यावेळेस शेत गट नंबर २२८ मध्ये कापसामध्ये आंतरपीक म्हणून १०४ गांजाची झाडे त्याची किंमत तीन लाख ८७ हजार ६०० रुपये आणि वजन 129 १३० किलोग्राम असा ऐवज जप्त केला. शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाकल करुन अटक केली. त्यनंतर लोहा येथील न्यायालयात हजर केले. न्यायाधीश प्रशांत तौर यांनी ता. २८ आॅक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.