नांदेड : लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आजच्या घडीला तीन लाख ७९ हजार १२ पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. सध्या ४२९ गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे तर आजपर्यंत २६ पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. जिल्हाभरात व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो.
हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या नऊ पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे हे अर्थसहाय्य ता. २९ सप्टेंबर रोजी जमा करण्यात आले आहेत. इतर प्रकरणाचे प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.
जिल्ह्यातील ६३ गावे सध्या लम्पीने बाधित आहेत. या ६३ गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे २९ हजार ८३१ एवढे आहे. यातील ४२९ बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील गावांची संख्या ३५९ एवढी आहे. एकुण गावे ४२२ झाली आहेत.
या बाधित ६३ गावाच्या पाच किलोमीटर परिघातील ४२२ गावातील (बाधित ६३ गावांसह) एकुण पशुधन संख्या ही एक लाख १४ हजार २६८ एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या २६ एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.