नांदेडची हळद निघाली बांगलादेशात; शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार 

नांदेड - नवा मोंढा बाजार समितीतून हळदीने भरलेल्या ट्रकला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
नांदेड - नवा मोंढा बाजार समितीतून हळदीने भरलेल्या ट्रकला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

नांदेड - शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका शेतकरी उत्पादक कंपनीकडून तीनशे टन हळद शनिवारी (ता. २६) बांगलादेशला रवाना झाली. नवा मोंढा भागात आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, प्रल्हाद इंगोले यांच्या उपस्थितीत ट्रकला हिरवी झेंडी दाखविण्यात आला. 

नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अलीकडल्या काळात हळद पिकाकडे वळले आहेत. नांदेड तसेच वसमत येथे मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. या बाजारात काही वेळा दरात घसरण होते. अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी काही शेतकरी उत्पादक कंपन्या हळदीच्या निर्यातीत पुढे आल्या आहेत. यात मालेगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकरी मीत्र शेतकरी उत्पादक कंपनी व वसमत येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनी या दोन कंपन्यांनी सभासद शेतकऱ्यांची प्रत्येकी दिडशे टन अशी तीनशे टन हळद निर्यात करण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील सह्याद्री फार्म या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हळदीची निर्यात बाग्लादेशला करण्याचा निर्णय घेतला. 

ट्रकला दाखवली हिरवी झेंडी
शनिवारी (ता. २६) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मार्केट यार्डातून हळदीने भरलेल्या ट्रकला आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या उपस्थित हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सचिव वामनराव पवार, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी श्री. शिरफुले, कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, हळद व्यापारी बद्रीनारायण मंत्री, विजयकुमार गोयंका, प्रवीण कासलीवाल, बालाजी भायेगावकर, आयकर अधिकारी एकनाथराव पावडे, आनंद धुत, बालाजी पाटील भायेगावकर, विठ्ठल देशमुख, मधुकरराव देशमुख, शेतकरी मित्र कंपनीचे प्रल्हाद इंगोले, सुर्या कंपनीचे प्रल्हाद बोरगड, भगवान इंगोले आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना मिळणार चांगला दर
शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पहिल्यांदा थेट शेतकऱ्यांनी आपला शेतमाल जगाच्या बाजारपेठेत विकायला सुरुवात केली. यावेळी आमदार कल्याणकर म्हणाले की शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन, व्यापारी व शेतकरी दोघांच्याही सोबत राहील. शासन शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. मधुकरराव देशमुख म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपनीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत मिळत आहे.

 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com