आजरा : आजरा तालुक्यातील घनसाळ भाताला पाच वर्षांपूर्वी जीआय (भौगोलिक उपदर्शन) मानांकन प्राप्त झाले. आता दुसरा टप्पा सुरू झाला असून येथील 35 गावांतील 120 घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना चेन्नई येथील भारत सरकारच्या जिओग्राफिकल इंडिकेशन (भौगोलिक उपदर्शन) कार्यालयाने मान्यता दिली आहे, अशी माहिती आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांनी दिली.
अनेकांची पसंती असलेल्या घनसाळ तांदळाला मागणी सातत्याने वाढत आहे. या भाताचे क्षेत्र वाढावे त्याचबरोबर चांगल्या दर्जाचा तांदूळ ग्राहकांना मिळावा यासाठी आजरा तालुका शेतकरी मंडळ गेल्या एक तपापासून प्रयत्न करीत आहे. या तांदळाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले जात आहे.
मंडळाच्या मार्गदर्शनानुसार उत्पादित केलेला तांदूळ मंडळाकडून खरेदी केला जातो. प्रतवारीनुसार साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत तांदळाला दर दिला जातो. यंदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे भात उत्पादन करण्यासाठी शुद्ध घनसाळ बियाणे मंडळातर्फे पुरविले जाणार आहे.
काळा जिरगा या देशी वाणाचे बियाणे मंडळाकडे उपलब्ध असून सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादन घेण्यासाठी व बियाण्यांच्या मागणीसाठी मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मंडळातर्फे शेतकऱ्यांना लवकरच प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.