नागरिकांनो, राहा "निगेटिव्ह', जगण्याची उमेद ठेवा "पॉझिटिव्ह' 

Citizens, stay "negative", hope to live "positive"
Citizens, stay "negative", hope to live "positive"

जयसिंगपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक शहरे आणि गावेही कोरोनाच्या दहशतीखाली आहेत. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. जिल्हा समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत आता कोरोनाचे संक्रमण रोखण्याची जबाबदारी प्रत्येकावर आली असून निगेटिव्ह राहून पॉझिटीव्ह जगण्याची उमेद निर्माण होण्याची गरज आहे. 

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने जीवाची बाजी लावली आहे. यात प्रशासनातील प्रत्येक घटकाचे योगदान राहिले आहे. संक्रमणाचे धोके ओळखून प्रशासनाने लॉकडाउन पुकारला असला तरी अद्यापही अनेक ठिकाणी बेफिकीरी दिसत आहे. ही बेफिकीरी स्वत:सह कुटुंबाला आणि समाजाचेही आरोग्य धोक्‍यात आणण्यास कारणीभूत ठरत आहे. लॉकडाउनमध्ये मास्कचा वापर अनेक ठिकाणी टाळण्यात येत आहे. 

औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांमध्येही पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सुरुवातीला रिकामी असणारी मैदाने पुन्हा क्रिकेटपटूंमुळे गजबजून गेली आहेत. पारकट्यावर आता कोरोनाच्या चर्चेऐवजी महापुराची चर्चा रंगू लागली आहे. या साऱ्या घटनांमध्ये आपण सुरक्षित आहोत का याचा मात्र विचार होताना दिसत नाही. लॉकडाउनमध्ये मागील दाराने सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. मात्र, हे करत असताना व्यावसायिकांकडून ग्राहकांची सुरक्षितता मात्र वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

जिल्ह्यांतर्गत बससेवा बंद असल्याने अनेक मार्गावर अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांचा वापर प्रवासाकरीता केला जात आहे. यातील अनेक वाहने परजिल्ह्यासह परराज्यातून येणारी असल्याने संक्रमणाचाही धोका वाढला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पाळलेले नियम आता मात्र अनेकांनी स्वत:हून शिथील केल्याचे पहायला मिळत आहे. ही बाब सर्वांसाठीच धोक्‍याची ठरु शकते. जिल्ह्यावर कोरोनाचे संकट टाळण्यासाठी आता प्रत्येकानेच निगेटिव्ह राहून पॉझिटिव्ह जगण्याची गरज आहे. 

लग्नकार्यात नियम डावलून गर्दी अधिक... 
सध्या नियमावली घालून लग्न कार्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, यातही नियमापेक्षा अधिक लोकांची गर्दी दिसत आहे. यातही मास्कचा वापर होताना दिसत नसल्याने लग्नकार्येदेखील आता चिंतेचा विषय बनला आहे. 

ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा... 
60 वर्षावरील ज्येष्ठांनी याकाळात आपले आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कोरोना संकमणाकडे पाहिल्यास यामध्ये ज्येष्ठांनाच अधिक धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळण्याकडे कुटुंबियांनीदेखील जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com