कोल्हापूर : राज्यात कोरोना व्हायरसचे प्रस्थ वाढत असताना आणि जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव पोहोचत असताना राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर मात्र कोठे आहेत? असा प्रश्न लोकांना पडला आहे. या साथीचा प्रादुर्भाव कमी व्हावा, त्याची लागण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर मंत्री रस्त्यावर उतरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असताना आरोग्य खात्याचे मंत्री असूनही श्री. यड्रावकर मात्र यापासून चार हात लांबच असल्याचे चित्र आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले तीन आमदार आहेत. त्यात साताऱ्याचे शंभुराजे देसाई यांना गृह राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. ज्या जिल्ह्याने सेनेला दोन खासदार आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सहा आमदार दिले, त्या कोल्हापूर जिल्ह्याला सेनेच्या कोट्यातून मंित्रपद द्यायचे झाल्यास आमदार प्रकाश आबिटकर हे मुख्य दावेदार असताना श्री. यड्रावकर यांची मंित्रपदी लागलेली वर्णीच राजकीय क्षेत्राला हादरा देणारी ठरली आहे. त्यांच्याकडे आरोग्य खात्याचे राज्य मंित्रपद आहे. जिल्ह्यात आणि राज्यात एकीकडे कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असताना त्यावरील उपाययोजना किंवा खबरदारी म्हणून काय करावे, यासाठीच्या नियोजनातही त्यांचा
सहभाग दिसत नाही.
लोकांपेक्षा तेच जास्त घाबरलेत का ?
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अधिवेशनानंतर लगेच कोल्हापुरात आल्याआल्या सीपीआर हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी संपर्क साधून या साथीविषयी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती घेतली. पण ज्यांच्याकडे लोकांच्या आरोग्याची जबाबदारी ते श्री. यड्रावकर मात्र यापासून दूरच आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी यासंदर्भात आयोजित बैठकही रद्द केली, यावरून लोकांपेक्षा तेच जास्त घाबरलेत का ? असा प्रश्न निर्माण होतो. मुळात श्री. यड्रावकर यांच्याकडे दिलेले आरोग्य खाते याविषयीच उलटसुलट चर्चा आहे. त्यांची बैठकीतील उपस्थितीत, त्यांच्याकडे असलेल्या खात्यांचा त्यांना असलेला ‘अभ्यास’, बैठकीतील त्यांची वर्तणूक याबाबतही नाराजी आहे. त्यातच कोरोनासारख्या गंभीर आजाराची साथ सुरू असताना तेच संपर्काच्या बाहेर आहेत. त्यांच्या या एकूणच कार्यपध्दतीवरून मंत्री यड्रावकर आहेत तरी कोठे ? असा प्रश्न नागरिकांनाही पडला आहे.
कोरानोविषयी आपण गंभीर : मंत्री यड्रावकर
कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भाव सुरू झाल्यावर चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी दूतावासाच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यांना सुखरूप आणले आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. कोरोनाप्रश्नी उपाययोजनांबद्दल आपण गंभीर असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री पाटील-यड्रावकर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलणे, शाळाही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणे, कोरोनाच्या उपाययोजनांसाठी निधी देणे या निर्णयप्रक्रियेत आपण सहभागी होतो. नागरिकांनीही पुरेशी खबरदारी घेतल्यास कोरोनाच्या संकटावर मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.