सारथी संस्थेला दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी

Demand for allocation of Rs 2000 crore to Sarathi Sanstha
Demand for allocation of Rs 2000 crore to Sarathi Sanstha

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) दोन हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करा, या प्रमुख व अन्य मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाज महिला आघाडीतर्फे तहसीलदार अनंत गुरव यांना आज देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सारथी संस्था मराठा समाजासाठी अत्यंत सक्षमपणे सुरु होती. हजारो गरीब मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत असताना मराठा द्वेषभावनेतून सचिवालयातील अधिकाऱ्यांनी कट करुन संस्थेच्या स्वायत्तेवर घाव घालून बिनकामाच्या चौकशीतून गेल्या १० महिन्यांत तिचे काम ठप्प झाले आहे. मुख्यमंत्रानी जाहीर आश्वासन देऊन दाद‌ घेतलेली नाही.

कोल्हापुरात १५ नोव्हेंबरला सकल मराठा बांधवांच्या बैठकीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आमदार पी. एन्.पाटील, आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत  संस्थेची स्वायत्तता पूर्ववत ठेवणे व अन्य मागण्या येत्या १० दिवसांत मान्य न केल्यास पूणे येथे २९ नोव्हेंबर २०२० रोजी लाल महालावर येऊन बेमुदत आंदोलन जाहीर करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून सारथी बचाव संकल्प यात्रा पुण्यात धडकणार होती. पण, त्याच दिवशी राज्य सरकारने संस्थेची स्वायतत्ता देण्याचा आदेश दिला. ही स्वागतार्ह बाब आहे. 

राजर्षी शाहूंचे सारथी संस्था जिवंत स्मारक असून या संस्थेला स्वतःची इमारत द्यावी, संस्था कार्यरत करण्यासाठी पूर्वीच्या ७५ कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेउन त्यांना पुन्हा नियुक्त करावे, संस्था बंद पडावी या हेतूने स्वायत्तता खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, संस्थेच्या संचालक मंडळाची स्थापना करावी, संस्थेच्या संचालक मंडळावर मराठा समाजाच्या प्रतिनिधींना घ्यावे,  समाज हिताची तारादूत संकल्पना पुन्हा कार्यान्वित करावी, कर्तव्यदक्ष व्यवस्थापकीय संचालक परिहार यांच्या चौकशीचा अहवाल तातडीने जाहीर करावा,
राजर्षी शाहू नावे असणाऱ्या सारथीचे त्यांच्या जन्मभूमीत उपमुख्य केंद्र व प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्रे सुरु करावीत, या मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात. कारण मराठा आरक्षण स्थगितीनंतर समाजात मोठा असंतोष असून, किमान राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी सकल मराठा समाजाची भावना आहे.

शिष्टमंडळात शैलजा भोसले, तेजस्विनी नलवडे, सरिता सासणे, स्मिता हराळे, आरती वाळके, शर्मिला भोसले, हर्षदा सुर्वे, मीनल दळवी, सुनंदा चव्हाण, मीना नलवडे, तृप्ती सावंत, दिप्ती सावंत, वैशाली जाधव, अनुराधा घोरपडे, मंगल कुऱ्हाडे, उज्वला जाधव, संयोगिता देसाई यांचा समावेश होता.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com