कोल्हापूर : दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी होऊ लागल्याने काही वर्षांपूर्वी गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी आणली, तसा कायदाही झाला. कायद्यात गर्भलिंग करणाऱ्या डॉक्टरांसह ही चाचणी करून घेणाऱ्या दाम्पत्यांवरही कारवाईची तरतूद केली. प्रत्येक रुग्णालयात या कायद्याचे गांभीर्य सांगणारे फलकही झळकले; पण प्रत्यक्षात ही चाचणी बंद आहे का? असा प्रश्न विचारला, तर अर्थात त्याचे उत्तर हे नाही असे आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे अजूनही समाजातील वास्तव आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या काही प्रवृत्ती यामुळे गर्भलिंग निदान चाचणी खुलेआम सुरू आहे. त्याचा लेखाजोखा मांडणारी मालिका आजपासून...
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायदा झाला, त्यातून गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी आणली गेली; पण मुलगा हाच वंशाचा दिवा असा समाजात असलेला समज आणि त्याला वैद्यकीय क्षेत्रातील काही अप्प्रवृत्तीकडून घातले जाणारे खतपाणी यामुळे कोल्हापुरात २५ हजारांत गर्भलिंग निदान करून देणारी टोळीच कार्यरत झाली आहे. रंकाळा उद्यान आणि परिसर या टोळीचा केंद्रबिंदू असून एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये खुलेआम हा प्रकार सुरू आहे.
एजंटांकडूनच सावज शोधला जातो
पहिल्या दोन मुलीच असलेले दाम्पत्य किंवा मुलगाच हवा म्हणून प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाचा शोध घेणारे एजंट या टोळीत सक्रिय आहेत. या एजंटांकडूनच सावज शोधून त्यांना गर्भलिंग निदान चाचणी करून देण्याचे आश्वासन दिले जाते. संबंधित दाम्पत्य तयार झाल्यानंतर फक्त पती-पत्नी या दोघांनाच रंकाळा परिसर किंवा आजूबाजूला बोलवले जाते. गर्भधारणेनंतर तीन महिन्यांनी पोटातील बाळाचे लिंग समजते, त्यामुळे एवढा कालावधी झालेल्या दाम्पत्याला बोलवून त्यांच्याशी हा व्यवहार ठरवला जातो. एकदा व्यवहार ठरला की अशा चार महिला एकत्रित झाल्यानंतरच त्यांना एका चारचाकीतून ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित एजंटवरच असते.
२५ हजार रूपये फि आकारली जाते
ज्या महिलेची गर्भलिंग तपासणी करायची, तिच्यासोबत कोणालाही नेले जात नाही. या महिलेसोबत पाण्याच्या बाटलीशिवाय कोणतीही वस्तू नेण्यास प्रतिबंध घालण्यात येतो. मोबाईल, पर्स, पैसे यापैकी एकही वस्तू सोबत ठेवली जात नाही. पहिल्यांदा २५ हजार रूपये फि म्हणून घेतल्यानंतर पती-पत्नीला बोलवण्यात येते. काही ठराविक अंतरावरच पतीला बसवले जाते, तत्पुर्वी संबंधित महिलांना घेऊन जाणाऱ्या टोळीचा वावर याच परिसरात एका वाहनातून सुरू असतो. एखाद्या झाडाखाली किंवा अपार्टमेंटच्या बेसमेंटला संबंधित महिलेला सोडून तिच्या साडीचा रंग, वर्णन फोनवरून सांगून पतीला लांब अंतरावर बसवले जाते.
तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा
तेथून एका चारचाकीमधून संबंधित महिलेला एजंट घेऊन जातो. सुमारे दोन तासांनी ही तपासणी करून संबंधित महिलेला रिपोर्टसह जेथे घेतले जाते, तेथेच सोडले जाते.
संबंधित टोळीकडून अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही तपासणी केली जाते. त्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवली जाते. तपासणीसाठी महिला दाखल होताच तिला पाणी पाजून तातडीने ही चाचणी करून जेवढ्या लवकर ही तपासणी पूर्ण होईल तेवढ्या लवकर करून लगेच या महिलांना आणलेल्या गाडीतून सोडले जाते. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात या टोळीचे रॅकेट पसरले आहे.
जिलह्यातील मूलींचा जन्मदर
वर्ष जन्मदर
2001 839
2008 880
2013 817
2015 924
2018 933
2019 925
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.