पाच हजार कुटुंबे पुन्हा भितीच्या छायेखाली

flood effect on five thousand families in ichalkaranji
flood effect on five thousand families in ichalkaranji

इचलकरंजी - शहरातील सुमारे पाच हजार कुटुंबे पुन्हा महापूराच्या भितीच्या छायेखाली आहेत. गेल्या वर्षीच्या महापूराच्या प्रलयातून सावरत असतानाच पुन्हा एकदा ही कुटुंबे अवस्थ होताना दिसत आहेत. गेल्या वर्षीचा अनुभव पाठिशी असल्यामुळे पूरबाधीत क्षेत्रातील नागरिक आतापासूनच सतर्क झाले आहेत. तर प्रशासन पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन सुरु झाले आहे.


गेल्यावर्षी आलेल्या महापूरामुळे वस्त्रनगरीतील मोठा भाग पाण्याखाली गेला होता. गेल्या शंभर वर्षातील हा सर्वात मोठा महापूर असल्याचे सांगण्यात आले. अनेक घरांची पडझड झाली. यंत्रमाग कारखान्यांत पाणी शिरले. त्यामुळे कोट्यवधींचा फटका या उद्योजकांना बसला. अनेकांचे संसार महापूराच्या पाण्यात वाहून गेले. व्यावसायिकांना जबर फटका सहन करावा लागला. या अनपेक्षीत नैसर्गिक आपत्तीतून पूरबाधीत क्षेत्रातील जनजीवन सुरळीत होत असतानाच कोरोनाचे नवे संकट निर्माण झाले आहे. पण कोरोनापेक्षाही संभाव्य महापूराच्या संकटाने आतापासूनच भिती निर्माण होत आहे. 

गेल्या वर्षीच्या महापूराच्या संकटाने अनेकांना विस्थापीत होण्याची वेळ आली. अगदी बड्या राजकीय नेत्यांची घरेही महापूराच्या विळख्यात सापडली होती. या संकटातही "सेंट्रल किचन'चा उपक्रम इचलकरंजीने महाराष्ट्राला दिला. त्यामुळे महापूराच्या काळात हजारो लोक विस्थापीत होवूनही त्यांच्या जेवणाचे हाल झाले नाहीत. आता मात्र कोरोनामुळे सर्वच हैराण झाले आहेत. अशा परिस्थीतीत पुन्हा महापूर आला तर काय होणार, अशा भितीनेच संभाव्य पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. 

प्रशासन अद्याप कोरोनाचे संकट दूर करण्याच्या कामात व्यस्त आहे. सोबत संभाव्य महापूराच्या नियोजनाबाबत हालचाली सुुरु केल्या आहेत. पण अद्याप त्याला गती आलेली नाही. पुढील काही दिवसांत पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतराबाबत सूचना दिल्या जाण्याची शक्‍यता आहे. काही नागरिकांनी आतापासूनच सतर्कता दाखवित महापूर आल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरु केले आहे. गेल्या वर्षी किमती वस्तू महापूराच्या पाण्यात भिजल्या होत्या. यंदा मात्र नागरिक आतापासूनच दक्ष झाले आहेत. पण महापूराची भिती मात्र मनात कायम आहे. 

गेल्या वर्षी 81 फूट... यंदा किती? 
गेल्या वर्षी पंचगंगा नदीला आलेल्या महापूराने विक्रमी 81 फुटांची पाण्याची पातळी गाठली होती. त्यामुळे इचलकरंजीतील मोठे क्षेत्र महापूराच्या पाण्याखाली गेले होते. यंदा धरणांतील सद्या असलेला साठा पाहता महापूर येणार हे निश्‍चीत मानले जात आहे. त्यामुळे यावर्षी पंचगंगा नदीतील महापूराच्या पाण्याची पातळी किती फूटापर्यंत जाईल, याबाबत आतापासूनच तर्क - वितर्क केले जात आहेत. 

धोकादायक इमारतींना नोटीसा 
शहरात अनेक धोकादायक इमारती आहेत. पालिका प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही संबंधितांना नोटीसा देण्याचे काम सुुरु केले आहे. गेल्या वर्षी 74 जणांना नोटीसा दिल्या होत्या. 

2019 इचलकरंजी महापूर दृष्टीक्षेप 
* पंचगंगा नदी पाण्याची पातळी - 81 फूट 
* स्थलांतरीत कुटुंबे - 4878 
* स्थलांतरीत लोकसंख्या - 18852 
(7669 महिला, 8028 पुरुष, 3155 मुले) 
* एकूण छावण्या - 56 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com