कोल्हापूर : नवीनकुमार जिंदल यांच्या वक्तव्यावरून भाजपने माफी मागण्याची मागणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले होते, हसन मुश्रीफ यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, आम्ही माफी मागणार नाही. पाटील यांच्या या वक्तव्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांना एवढी मस्ती कुठुन आली ? असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कागलमध्ये खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत असताना मुश्रीफ यांनी अशी प्रतिक्रीया दिली.
यावर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या मीडिया सेलचा प्रमुख नविनकुमार जिंदाल याने शरद पवार यांच्या आजारपणाचा संबंध वाझे प्रकरणाशी जोडला होता. त्यामुळे भाजपने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. यामध्ये मी काय चुकीचं बोललो होतो ? असा सवालही त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, चंद्रकांत पाटील हे अतिशय भित्रे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभा जागेवर उभारणे त्यांना जमले नाही, त्यामुळेच जिल्हा सोडून ते पुण्याला गेले. भाजप सरकारच्या मागील मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळाले होते. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसाने मुख्यमंत्र्यांविषयी बोलणे योग्य नाही.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात ५५ हजार बालके बाधित झाली आहेत. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील असो, सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न केला किंवा कोणतेही आरोप केले तरी महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालणार आहे. अशा घटनांना राष्ट्रवादी काँग्रेस योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.