हॉटेल, रेस्टॉरंट बंदचा भाजीपाल्याला फटका 

Hotel, restaurant closure hits vegetables
Hotel, restaurant closure hits vegetables

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रसार, यात सुरू असलेले लॉकडाउन आणि हॉटेल, रेस्टॉरंटना बंदी, वाहतुकीतील अडथळे आदींमुळे जिल्ह्यातील भाजीपाला व फळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काजू, आंबा, फणस जागेवरच पडून आहे. तर भाजीपाला विक्रीची समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे हळूहळू आता भाजीपाल्याचे दर वाढत जाण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. भाजीपाला व फळे उत्पादनावर जवळपास 40 टक्‍के परिणाम झाल्याचा कृषी खात्याचा अंदाज आहे. 

कोरोनाचे सर्वदूर परिणाम दिसू लागले आहेत. समाजातील एकही घटक यातून सुटलेला नाही. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्थाही अशीच बिकट बनली आहे. कोरोनाच्या काळात शेतात असलेला भाजीपाला विक्रीसाठी आणताना मोठी कसरत करावी लागली. सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने उत्पादित मालाची शहरात ठिकठिकाणी फिरून विक्री करणे, या मालाला योग्य भाव मिळवणे व पुन्हा गावाचा रस्ते धरणे कठीण झाले होते. त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचा नाद सोडला. आज त्याचे परिणाम बाजारात जाणवू लागले आहेत. भाजीपाल्याचा तुटवडा भासू लागला असून ग्राहकाला चढ्या दराने माल खरेदी करावा लागत आहे. 

ंभाजीपाल्याप्रमाणेच फळांच्या उत्पादन आणि विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आंबा, काजू, फणस विक्रीत अनेक अडचणी आहेत. काजू कारखाने बंद असल्याने शेतकऱ्याने घरात, शेतात आणि अंगणातच काजूचे ढीग लावले आहेत. काजू न खपल्याने सर्व आर्थिक चक्रच बिघडले आहे. आंब्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. वाहतुकीची व्यवस्था नसल्याने व जर व्यवस्था झाली तर भाड्याचा दर अव्वाच्या सव्वा असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. 
.... 
कोरोनामुळे भाजीपाला आणि फळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शिरोळ तालुक्‍यातून वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रकच्या ट्रक भाजीपाला जात होता. आता तो जवळपास बंद झाला आहे. मोठी हॉटेल, रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची किरकोळ विक्री सुरू आहे. हीच अवस्था फळांच्या बाबतीतही आहे. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधीक्षक 

...... 
एक एकर ढबू विक्री आणि लॉकडाउनची वेळ एकच आली. दरवर्षी मुंबई, हैदराबादला जाणारा ढबू यावेळी वाहतुकीमुळे पाठवता आला नाही. त्यामुळे जयसिंगपूर, कोल्हापूर येथे काही बॉक्‍स विक्रीसाठी पाठवले; मात्र त्याला दरच मिळाला नाही. या ढबूच्या लागवडीपासून काढणीपर्यंत 1 लाख 65 हजार रुपये खर्च केले. हातात फक्‍त 1350 रुपये आले. राजस्थानी लोकांनी त्यांच्या गायीसाठी ही ढबूची झाडे नेली. 
- आदगोंडा पाटील, शेतकरी, निमशिरगाव (ता. शिरोळ) 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com