हेरिटेज ऑफ कोल्हापूर - चित्रदुर्ग मठ : महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा वारसा

Legacy of the philosophy of Mahatma Basaveshwar in kolhapur
Legacy of the philosophy of Mahatma Basaveshwar in kolhapur

कोल्हापूर - दसरा चौकात चित्रदुर्ग मठाची वास्तू भव्यता घेऊन उभी असली तरी शांतता, साधेपणाने उभारलेली आहे. महात्मा बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान आणि कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी श्री मुरघाराजेंद्र स्वामीजींच्या विनंती वरून कोल्हापुरात शून्य पीठाची उभारणी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यासाठी दसरा चौकातील जागा दिली. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची परंपरा इथे रुजण्यास कोणताही अडथळा किंवा मनात किंतू न बाळगता छत्रपती शाहूंचा मदतीचा हात बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाला साजेसा ठरला.
  

महात्मा बसवेश्वरांनी सुरू केलेल्या वीरशैव संत परंपरेतील आठवे जगत्‌गुरू श्री मुरघाराजेंद्र स्वामीजींची शून्य सिंहासन मालिकेतील कर्नाटकात असणाऱ्या चित्रदुर्ग पीठावर प्रतिष्ठापना झाली. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या भेटी दरम्यान शून्य पीठाची निर्मिती करण्याचा मानस १९०८ मध्ये व्यक्त केला. १९११मध्ये त्यासाठी ही जागा दिली आणि मठ बांधला.

एका भव्य कमानीतून आत जाताना दोन्ही बाजूला ओवऱ्या, मध्ये आतील बाजूस खोल्या आहेत. पुढे चौक असून, तीनही बाजूला इमारतीमध्ये कमानीचा एकसारखेपणाच एकसंधता राखतो. त्यामागे खोल्या आहेत. दोन्ही बाजूला सारखी प्रवेशद्वार आहेत.
समोर असणारी इमारत मात्र दुमजली असून, दगडाचे बांधकाम आहे. त्याच्या तळमजल्यावर दगडी कमानीचा मंडप आहे.

पश्‍चिमेकडे तोंड असलेले तीन लहान गाभारे पूर्व भिंतीत आहेत. त्यातील मध्यभागी शिवलिंग, डाव्या बाजूस बसवेश्रवरांची मूर्ती आहे. या इमारतीच्या मागील बाजूस भक्कम दगडी कमानीचा प्रशस्त व्हरांडा आणि त्यामागे खोल्या आहेत. मध्य भागातून मागील बाजूस उतरणारा जिना आणि घडीव दगडांची कमान आहे. मागे विहीर आणि रिकामी जागा आहे. हा दरवाजा कदाचित पूर्वेकडून मठात येणारे प्रवेशद्वार असावे.

वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडात घडवलेला गोल जिना हा उत्तम नमुना आहे. वरती मोठे दालन आहे. घडीव दगडांची ही भक्कम इमारत बांधण्यात सुरक्षेचा विचार जास्त केलेला दिसतो.
छत्रपती शाहूंच्या शैक्षणिक धोरणानुसार लिंगायत विद्यार्थ्यांची व्यवस्था म्हणून दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाज ही संस्था १९०६ मध्ये स्थापन झाली होती. जगद्गुरु   मुरघाराजेंद्र वीरशैव विद्यार्थी वसतिगृह १९११ पासून मठात सुरू झाले. पुढे ते कमी पडल्याने१९६३ मध्ये मठाच्या जागेत नवी दुमजली इमारत बांधून विस्तार करण्यात आला. छत्रपतींच्या आश्रयाने, दातृत्वने उभ्या असलेल्या या वास्तूचे नियंत्रण, कारभार आज कर्नाटकातील चित्रदुर्गमधून चालतो. आणि मठाला मठाधिपती नाहीत ही बाब खटकते. बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाला साजेसा वापर आणि विचारांचा वारसा जपण्यासाठीच या वास्तू चिरंतन 
राहिल्या पाहिजेत.

शिवबसव जयंतीची अनोखी परंपरा 
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंती सलग येत असल्याने शिवबसव जयंतीची अनोखी परंपरा इथे सुरू झाली. पुराच्या काळात पूरग्रस्तांना आसरा देणारं हे महत्त्वाचं ठिकाण आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com