वुहानच्या कोरोनात गांगरलो , पण सुखरूप परतलो ; कोल्हापूरच्या तरूणाने सांगितला चीनमधील थरार 

olhapur student told experience in china wuhan
olhapur student told experience in china wuhan

कोल्हापूर - चीनच्या वुहानमध्ये कोरोनाची लाट उसळली, बघता बघता हजारो लोक रूग्णालयात अत्यवस्थ स्थितीत गडबडू लागले. त्याची माहिती वृत्तवाहिन्यांव्दारे कोल्हापुरातही धडकली. जिल्ह्यातील काही विद्यार्थी चिनमध्ये शिक्षण घेतात. त्यांचे येथील पालक हवालदिल झाले. या विद्यार्थ्यांनी वुहानमध्ये कोरोनाचा आखो देखा हाल अनुभवला आणि गांगरलेल्या स्थितीतही विद्यार्थ्यांनी कल्पकता पणाला लावली आणि कोल्हापूरातील घर गाठले. कोरोनामुक्त असल्याचा निर्वाळा देत त्यांनी वुहानमध्ये भयकारी अनुभव घेतला तोच त्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला.
 
जयसिंगपूरचा सूरज साखरपे वुहान शहरात होता. डिसेंबर 2019 मध्ये वुहान शहरात कोरोनाचा तो भयकारी विस्पोट झाला. वर्दळीने गजबजलेले शहर भितीने जणू गोठून गेले. सर्व व्यवहार ठप्प झाले. यात कोल्हापुरातून चिनमध्ये शिक्षणासाठी गेलेले आणि वुहानमध्ये रहाणारे विद्यार्थी तेथेच अडकले. या विद्यार्थ्यांना धडकी भरवणारे अनुभव घ्यावे लागले. 

सूरज साखरपे म्हणाला, " मी मित्राला भेटण्यासाठी वुहानमधील घरातून बाहेर पडलो आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अशा परिस्थितीत माझ्या अंगावरचे फक्त कपडे आणि खिशात पासपोर्ट होता. अचानक आलेल्या संकटामुळे घाबरगुंडी उडाली. पण डगमगून चालणार नव्हते. या संकटावर मात करण्यासाठी शक्कल लढवावी लागली. सातशे पेक्षा अधिक भारतीयांना सोशल मीडियाद्वारे एकत्र जोडलेला आमचा एक समुह होता. या समुहातील प्रमुखांनी मिळून भारतात परत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले.'' 

 पुढे काय? असा प्रश्न माझ्यासमोर होता. मी माझ्या फ्लॅटवर जाण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण लॉकडाऊन कडक असल्याने तशी परवानगी मिळाली नाही. मी तिथेच अडकलो. विद्यापिठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना अत्यावश्‍यक गोष्ठी पुरवल्या. तरीही सर्वांनाच घरची ओढ होती. वुहानमधील सातशे भारतीय सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मी मित्राच्या मदतीने या सर्वांची माहिती गोळा केली. बिजिंग मधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. भारत सरकारने याची दखल घेतली. यामुळे सर्वांनाच घरी परतता येणार, या आशेने बहुतेक भारतीयांनी परतीची प्रक्रिया पूर्ण केली. आमच्या प्रयत्नांना यश म्हणून 31 जानेवारीला साडे तीनशे प्रवाशांना घेऊन पहिल्या विमानाने उड्डाण केले. उर्वरीत प्रवासी फेब्रुवारीमध्ये भारतात परतले. मला फ्लॅटवर जाण्याची संधी मिळालीच नाही. सगळे समान तिथेच सोडून मी मायदेशी परतलो. विमान दिल्लीच्या पर्यायी धावपट्टीवर उतरले आणि पुढे वीस दिवस क्वारंटाईन व्हावे लागल्याचे सुरजने सांगितले. 

भारतात लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी सूरज भारतात आला. कोल्हापूरातील जयसिंगपूरच्या घरी राहीला. भारतात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच तो पून्हा चिन मधील शंघाईला परतला. सध्या चिन शंघाई येथे सर्व जनजीवन सुरळीत सुरू असल्याचे सूरजने सांगितले.

 संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com