
गेल्या दहा महिन्यापासून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडॉऊन काळात रेल्वेसेवा बंद होती
कोल्हापूर - येथील रेल्वेस्थानकात कोल्हापूर- मुंबई विशेष रेल्वेसाठी आरक्षण सुविधा सुरू झाली आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत रेल्वेस्थानकाच्या तिकिट खिडकीवर तिकीट विक्री तसेच 24 तास ऑनलाईन आरक्षण मिळणार आहे.
गेल्या दहा महिन्यापासून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडॉऊन काळात रेल्वेसेवा बंद होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी लॉकडाऊन शिथिल झाले. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्या काही ठराविक मार्गांवर सोडण्यात आल्या. मात्र, यात कोल्हापूर- मुंबई व मुंबई- कोल्हापूर या मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यानंतर विविध पातळ्यांवर कोल्हापूर -मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस सुरु करावी, अशी मागणी झाली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेले. यावेळीही ही मागणी झाली. यावेळी रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-मुंबई या मार्गावर महालक्ष्मी एक्सप्रेसच्या वेळेतच विशेष रेल्वे येत्या एक फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानुसार आजपासून प्रत्यक्ष कोल्हापूर-मुंबई विशेष रेल्वेसाठी आरक्षण सुविधा व तिकीट विक्रीला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
हे पण वाचा - मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात
संपादन - धनाजी सुर्वे