धक्‍कादायक ! बालकामगार अन्‌ बालगृहातील मुले उपाशीपोटी 

1Child_Labour
1Child_Labour

सोलापूर : बालकामगार मुलांना दरमहा चारशे रुपयांचे विद्यावेतन मिळते तर बालगृह चालविणाऱ्या संस्थेला दरमहा एका मुलांमागे दोन हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र, 12 महिन्यांपासून अद्याप एकाही मुलाला विद्यावेतन तर बालगृह चालविणाऱ्या संस्थांनाही अनुदानाचा दमडा मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी मिळेल ते अन्न खाऊन रात्र काढत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचा निर्णय झाला मात्र, बालकामगार अन्‌ बालगृहांमधील मुलांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कोरोना या विषाणूच्या संक्रमणाची साखळी खंडीत व्हावी या हेतूने केंद्र व राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. जीवनावश्‍यक वस्तू वगळता अन्य उद्योग व व्यवसाय बंदच आहेत. त्यामुळे हातावरील पोट असलेल्या विडी कामगारांसह अन्य कामगारांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा राहिला आहे. बालकामगार मुलांना दरमहा मिळणारे 400 रुपयांचे विद्यावेतनही मिळाले नसल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. दुसरीकडे राज्यातील 562 बालगृहांमध्ये तब्बल 23 हजार मुले असून त्यांच्यासाठी संबंधित संस्थांना सरकारकडून दरमहा दोन हजारांचे अनुदान दिले जाते. प्राप्त अनुदानातून त्या मुलांच्या जेवणाचा खर्च भागविला जातो. मात्र, मागील वर्षभरात या संस्थांना सरकारकडून दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे बालगृहांमधील मुलांच्या पोटाचा प्रश्‍न गंभीर बनल्याचे बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 


बालगृहांमधील विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बालगृहांमधील मुलांची नियमित आरोग्य तपासणी सुरु आहे. बालगृह परिसरात जंतूनाशकाची फवारणीही करण्यात आली असून नियमित रिपोर्टिंग सुरु आहे. विद्यार्थ्यांना मास्क दिले असून जनजागृतही केली जात आहे. संबंधित संस्थांना अनुदान मंजूर झाले असून ते लवकरच मिळेल. 
- दिलीप हिवराळे, विभागीय उपायुक्‍त, बालविकास, पुणे 


राज्याची स्थिती 
बालगृहांची संख्या 
562 
बालगृहांमधील मुले 
23,172 
अनुदानाची प्रलंबित रक्‍कम 
55.61 कोटी 
बालकामगार प्रकल्पांमधील मुले 
32,700 
थकलेले विद्यावेतन 
15.70 कोटी 


विडी कामगारांच्या घरातील धान्य संपले 
सोलापुरात विडी व यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर असून सुमारे आठ ते दहा हजार कुटुंबांचे हातावरील पोट आहे. त्यांची मुले बालकामगार म्हणून काम करीत असल्याने त्यांना बालकामगार प्रकल्पात भरती करण्यात आले. मात्र, आता लॉकडाउनमुळे त्या मुलांना घरी पाठविण्यात आले आहे. दुसरीकडे त्यांच्या पालकांचेही काम बंद झाले आहे. 22 मार्चपासून भागवाभागवी करीत पोटाखी खळगी भरली, मात्र घरातील शिल्लक धान्य संपल्याने आता पोट भरायचे कसे, असा प्रश्‍न त्यांना सतावू लागला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com