बापरे..! ग्रामीण भागात होत आहे कोरोनाचे भय अधिक गडद

Corona fear
Corona fear

महूद (सोलापूर) : हवाई मार्गाने आलेल्या कोरोनाने शहरांमध्ये हाहाकार माजवला. आता या कोरोनाचा विळखा ग्रामीण भागामध्ये घट्ट होत चालला आहे. महूदसारख्या ग्रामीण भागात आजअखेर 45 रुग्ण झाले असून, दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे भय अधिक गडद होत चालले आहे. 

22 जुलै रोजी येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर कडक उपाययोजना सुरू झाल्या. मात्र केवळ 15 दिवसांतच हा रोग गावाच्या कानाकोपऱ्यात पसरला. येथील रुग्णसंख्या 45 वर जाऊन पोचली आणि कोरोनाने दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी घेतला. ग्रामीण भागातील सामान्य, सुखी, समाधानी आणि सामाजिक जीवन जगताना कोरोना नावाचा विषाणू कुठेतरी चीनमध्ये आला आहे. तिकडे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याच्या मनमुराद गप्पा-टप्पा खेडेगावात सुरू झाल्या. अगदी वटवाघळाचे सूप आणि चीनच्या खाद्यसंस्कृतीची माहिती घेतली जाऊ लागली. तो कोरोना एअरपोर्टवरून केरळ, मुंबई, पुणे येथे दाखल झाल्यावर तिकडच्या चाकरमान्यांनी गावाकडची वाट धरली. शहरांमध्ये कोरोनाने थैमान घालून असंख्य लोकांचे प्राण घेतले. त्या वेळी अगदी जवळच्या नातेवाइकांनाही गावांमध्ये प्रवेश देताना त्यांची कसून चौकशी, त्यांच्या कुटुंबीयांना अपराध्याची वागणूक दिली गेली. परगावच्या पाहुण्यांना शिस्त लावताना ग्रामीण भागातील जनता आपण पाळावयाची शिस्त सोयीस्करपणे विसरली. 

त्यातच अनलॉकचा अर्थ कोरोनाचा उपद्रव कमी झाला, असा घेऊन मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये या बाबींना अडाणीपणा मानला जाऊ लागला. उपनगरातला कोरोना जिल्ह्यात आल्यावरही त्याचे गांभीर्य घेतले गेले नाही. दीड लाख रुपये अनुदान, रोगच अस्तित्वात नाही, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या वगैरे सोशल मीडियाबाजी झाली. कोरोनारूपी शत्रू खिंडीत आला तरी आम्ही दूरचित्रवाणीवरील बातम्या, मालिका पाहून आणि परदु:ख कस्पटासमान मानून वागू लागलो. विवाह समारंभ, पारावरच्या व दुकानातील गप्पा, एकमेकांच्या घरी अगदी अनिर्बंध वावर सुरू झाला. गल्लीबोळातील ख्यालीखुशालीची चर्चासत्रे यात विनामास्क, विनाकाळजी बिनधास्त सहभागी होऊ लागलो. कोरोना तालुक्‍यात आला तरी हॉटेलमध्ये चहा-नाश्‍ता घेत आपल्याकडे येणार नाही, अशा वल्गना चालूच राहिल्या. 

आज अख्ख्या गावाच्या कानाकोपऱ्यात तो पसरला आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू झाल्या. मला काहीच होणार नाही असे छातीठोकपणे म्हणत सामाजिक ठिकाणी राजरोसपणे वावरणारा जेव्हा कोरोनाबाधित झाल्याचे समजले, तेव्हा भय इथले वाढू लागले. आजारापेक्षा प्रतिबंध बरा, असे वाटू लागले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मित्र, पाहुणा, मेव्हणा, शेजारी, चुलता, चुलत भाऊ, सहकारी, दुकानदार, डॉक्‍टर यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर धाबे दणाणले. आणि आता तर वैऱ्याची रात्र असण्याचा गंभीर प्रकार महूदकर अनुभवत आहेत. दोन ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू भयावह आहेत. मला तर नाही ना? ही शंका जीव घेते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन जनता कर्फ्यूसारखे मार्ग अवलंबत आहेत. रॅपिड टेस्टची मर्यादा वाढविली जात आहे. पण भीती दूर होईल का? त्यासाठी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. 

कोणतेही नियम न पाळणाऱ्या अनिर्बंध तरुण पिढीने घरातील ज्येष्ठांसाठी तरी हे नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन महूदचे उपसरपंच दिलीप नागणे यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com