
सोलापूर : कोरोना व्हायरसने सध्या जगभर धुमाकूळ घातलेला असतानाच राज्यात मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. कोरोनाच्या सावटात मुख्यमंत्री ठाकरे यांना कोणत्याही एका विधिमंडळाचे सदस्य होता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मंत्रीमडळाने त्यांच्या आमदारकीबाबत राज्यपालांकडे शिफारस केली असली तरी राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळे राजकारण तापले असून नेमकं काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच सोशल मीडियाच्या फेसबुकवर एक पोल घेण्यात येत आहे. त्यामध्ये असं म्हटलं की ‘या महाराष्ट्राने दोन मुख्यमंत्री बघितले आहेत, एक पुरातले आणि एक कोरोनातले. तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण?’
हेही वाचा : करमाळ्याच्या तहसीलदारांनी घेतला महत्वाचा निर्णय
राज्यात गेल्यावर्षी कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात झालेल्या घडामोडीत अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची वर्णी लागली. मात्र अद्याप ते कोणत्याही विधिमंडळाचे सदस्य नाहीत. विधानपरिषद किंवा विधानसभेचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. मात्र, सध्या कोरोना व्हायरस हातपाय पसरत असल्याने सर्वत्र त्याचा परिणाम जाणवत आहे. अशा स्थितीत कोणतीही निवडणूक होणे शक्य नाही. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतभर लॉकडाऊन आहे. एकमेकांच्या संपर्कात न येणे हा एकच त्यावर उपाय असल्याचे सांगितले जात असून ‘घरातच बसा बाहेर पडू नका’ असे नागरिकांना आवाहन केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून योग्य निर्णय घेत असल्याने राज्यात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. कोणताही निर्णय घेताना ते सर्वांना विचारात घेत असून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतील नेतेही त्यांच्या पाठीशी आहेत. विरोधी पक्षातील काही नेते सुद्धा त्यांची प्रशंसा करतात. मात्र, त्यांना मुदतीत सदस्य होता नाही आले तर... अशी चर्चा रंगत आहे.
हेही वाचा : कोरोनाचा ग्रामीण भागातही प्रवेश; सांगोल्यात आढळला कोरोना बाधित रुग्ण
काय आहे पोल...
‘भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ या नावाने फेसबुकवर पोल क्रिएट केला गेला आहे. यावर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे आहेत. यावर २५ एप्रिल २०२० सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत १७९के व्होटस आले आहेत. यावरील कमेंटमध्ये सचिन सरडे यांनी म्हटले की, उत्तम भाषणशैली उद्धव साहेब ठाकरेंची आहे. नायतर तुम्ही मी पुन्हा येईन पुन्हा येईन. बाळासाहेब भिसे यांनी म्हटलंय की, आमचे आवडते मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, असं म्हणत पुरातले असं म्हटलं आहे. शिवाजी जाधव यांनी म्हटले की ठाकरे सरकार, चांद मुलानी यांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली आहे. अजय पाटील यांनी म्हटलंय की, पूरग्रस्तांना मदत पाहिजे असेल तर तीन दिवस घर पाण्याखाली पाहिजे, अशी अट घालणार. लोकांना पाण्यात पाहून बोटीतून फिरून सेल्फी काढणाऱ्या फडणवीस सरकारने आता मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघू नये. अजय होनराव यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पेजवर आवडते मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनाच जास्त पसंती, अजब- गजब. ज्यांनी पोल क्रिएट केला आहे त्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना विनंती केली असून त्यात म्हटलं की, आपण व्यक्त होताना वैचारिक पद्धतीने व्यक्त व्हावे. चिंतामणी कारखानीस यांनी म्हटलंय की, प्रश्न निरर्थक आहे. फक्त उद्धव ठाकरे हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे भाग्यविधाते श्री. उद्धव ठाकरे सरकार...! अतुल गवळी यांनी म्हटलं की, अभ्यास सुरू आहे. अभ्यास करून मुले एका वर्षात पास होतात. पण पाच वर्षे अभ्यास करून नापास झालेल्या देवेंद्रांपेक्षा, आश्वासनांच्या भडिमारापेक्षा, पोट फुगण्यापेक्षा ठोस निर्णय घेऊन स्पष्टपणे आहे ती वस्तुस्थिती, परिस्थिती सांगणारे, जनतेचा, रयतेचा, कष्टकरी श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा बुद्धीवंताचा, नोकरदार, सर्वसमावेशक घटकांसाठी झटणारा एक विश्वासू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... अशा अनेक कमेंट यामध्ये आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या आवडत्या नेत्यांचे समर्थन केले आहे.
हेही वाचा : ब्युटीपार्लर व्यवसायाला ऐन लग्न सराईत फटका
ज्येष्ठ घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांच्या मते...
मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्यासाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या ठरावावर राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता ठाकरे सरकारचे काय होणार, अशी चर्चा आहे. याच अनुषंगाने राज्यघटनेचे तज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी ‘सरकारनामा’शी संवाद साधला आहे. याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा ठराव नाकारला, तर राज्यघटनेचा भंग केला म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाताही येईल. मात्र, तोवर आताचे सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट सुरू राहणार, हे आत्ताच्या कालावधीत अत्यंत चुकीचे ठरेल. त्यासाठी राज्यपालांनी कलम १५९ प्रमाणे घेतलेली शपथ आठवावी, म्हणजे त्यांना शहाणपण सुचेल. याबाबत प्रा. बापट काय म्हणाले आहेत, हे वाचण्यासाठी ‘सकाळ’मधील वृत्त पहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.