सोलापूर महापालिकेचा मोठा निर्णय...काय तो वाचा ! 

Water_Supply
Water_Supply

सोलापूर : उजनी धरणातून शहराला दरवर्षी 20 एमएलडी पाणी सोडूनही नागरिकांच्या घशाची कोरड संपलेली नाही. दुसरीकडे जलसंपदा विभागाला कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी महापालिकेकडून दिली जात असतानाच पाणीपट्टीतून वसुली मात्र, खूपच कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील बोगस नळ कनेक्‍शन शोधण्यासाठी होम-टू-होम पडताळणीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी झोननिहाय समिती स्थापन करण्यात येणार आहे. 


पाच वर्षांच्या तुलनेत सोलापूरची लोकसंख्या वाढली असतानाही नळ कनेक्‍शनची संख्या तितकीच राहिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. सोलापूरला उजनी धरणातून दरवर्षी सरासरी 23 टीएमसी पाणी दिले जाते. वास्तविक पाहता या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास शहराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो, असा विश्‍वास पाटबंधारे विभागाला आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस नळ कनेक्‍शन असून पाण्याचे समान वाटपही होत नसल्याचे चित्र आहे. अशी स्थिती असतानाही ना अधिकारी ना पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले. त्यामुळे मागील पाच-सात वर्षांपासून नियमित पाणीपट्टी भरूनही नागरिकांना पाच-सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार शहरात आठ हजार नळ कनेक्‍शन नोंदणीकृत आहेत. प्रत्यक्षात मात्र, 35 ते 38 हजारांपर्यंत नळ कनेक्‍शन असल्याचा अंदाज महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्‍त केला. तरीही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेस दरवर्षी कोट्यवधींचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. 


ठळक बाबी... 

  • शहरातील कुटुंबसंख्या सुमारे तीन लाख अन्‌ नळ कनेक्‍शन आठ हजार 
  • नियमित पाणीपुरवठ्याची नागरिकांना प्रतीक्षा : पाणीपट्टी वसुली होईना 
  • नोंद एका नळ कनेक्‍शनची अन्‌ प्रत्यक्षात दोन-तीन कनेक्‍शनद्वारे पाणी वापर 
  • पाणी नियोजनाचा कृती आराखडाच नाही : पाण्याच्या अपव्ययाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 
  • बोगस नळ कनेक्‍शनमधून महापालिकेला पाच वर्षांत सुमारे आठ कोटींचा भुर्दंड 



उजनीतून शहराला होणारा पाणीपुरवठा 
थेट जलवाहिनीद्वारे : 0.90 टीएमसी 
नदीद्वारे : 22 टीएमसी 
एकरुख उपसा सिंचन : 0.13 टीएमसी 


सहायक फिटर अन्‌ आवेक्षकांद्वारे पडताळणी 
शहरातील बोगस नळ अथवा बंद असलेल्या नळ कनेक्‍शनच्या शोधासाठी झोननिहाय स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. 30 जानेवारीला सर्वसाधारण सभा होणार असून त्याबाबतचा ठराव मंजूर झाल्यास पुढील कार्यवाही होणार आहे. प्रत्येक झोनमधील सहायक फिटर व आवेक्षकांद्वारे घरोघरी जाऊन नळ कनेक्‍शनची पडताळणी केली जाणार आहे. त्यांचा अहवाल विभागीय अधिकाऱ्यांमार्फत महापालिकेस सादर करण्यात येईल. त्यानुसार बोगस नळ कनेक्‍शन धारकांकडून दंडासह रक्‍कम वसूल केली जाणार आहे, तर कनेक्‍शन बंद असलेल्यांची आकारणी कमी केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com