सांगली : मुंबईत 'बेस्ट' च्या मदतीसाठी यापुढे सांगली विभागातून एसटी कर्मचारी पाठवू नयेत अन्यथा कामगारांवर सतत होणाऱ्या अन्यायाविरोधात 11 मे पासून बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे. विभाग नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गतवर्षीपासून मुंबईतील 'बेस्ट' च्या मदतीसाठी सांगली विभागातून कर्मचारी पाठवले जात आहेत. सुरवातीला 430 कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांच्या कामगिरीवर पाठवले होते.
गैरसोयीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. अशा परिस्थितीत विभागातील 172 कर्मचारी कोरोना बाधित झाले. त्यामध्ये 32 कर्मचाऱ्यांची कुटुंबे देखील बाधित झाली. सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आजअखेर या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
कर्मचाऱ्यांनी 'बेस्ट' सेवेबरोबर जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांना जीव धोक्यात घालून परप्रांतात सुखरूप पोहोच केले आहे. सध्या कोरोनाचा दुसरी लाट आली आहे. तशातच 'बेस्ट' सेवेसाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा पाचारण केले जात आहे. परंतु कर्मचारी कामगिरीवर जाण्यास तयार नाहीत. इतर विभागापेक्षा सांगली विभागाने सलग सहा महिने जास्त काळ 'बेस्ट' साठी कार्यरत राहिले. तसेच कार्यशाळा आजअखेर कामगिरीवर आहेत.
पुन्हा एकदा 26 एप्रिल रोजी शंभर चालक-वाहक यांना 15 दिवसांसाठी बेस्ट उपक्रमास पाठवण्याचा आदेश आला आहे. परंतु कर्मचाऱ्यांची जीव धोक्यात घालून जाण्याची मानसिकता नाही. यापूर्वीच विभागातून 'बेस्ट' साठी कर्मचारी पाठवून नयेत अशी विनंती केली आहे. त्यामुळे यापुढे एकही कर्मचारी विभागातून मुंबईला पाठवू नये, अन्यथा 11 मे पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विभागीय अध्यक्ष अशोक खोत, सचिव नारायण सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.