इस्लामपूर : यापुढे कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा कुणाचाही बंद असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये फक्त बारा वाजेपर्यंतच सहभागी होतील, त्यानंतर व्यापारी आपापले व्यवसाय सुरू करतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज इस्लामपूर येथील व्यापारी महासंघाच्या वतीने घेण्यात आला. तशा आशयाचे फलक शहरात महासंघाच्या वतीने लावण्यात आले आहेत.
उठ की सुठ कुणीही बंद पुकारते आणि त्यामुळे व्यापारी वर्ग वेठीस धरला जातो. नागरिकांचीही गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन व्यापारी महासंघाने आज हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत आज ही भूमिका जाहीर केली. गांधी चौक आणि बस स्थानक परिसरात या निर्णयाचे फलक झळकले.
याबाबत बोलताना संघाचे अध्यक्ष मोहन पाटील म्हणाले, "बंद पुकारणारे लोक वैयक्तिक फायद्यासाठी व्यापाऱ्यांना गृहीत धरतात. व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान आणि ग्राहकांची गैरसोय विचारात घेतली जात नाही. कोरोना संसर्गामुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.त्यातून अद्याप सावरणे जमले नसताना कुणी ना कुणी सतत त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बंद पुकारत असतात.
आम्हाला त्यांच्या विषयाशी, मागण्याशी देणेघेणे नाही, आम्ही त्यांच्या सोबत राहू; परंतु फक्त बारा वाजेपर्यंत त्यांच्या बंदमध्ये सहभागी होऊ. त्यानंतर व्यवसाय सुरू केले जातील. नंतर कुणाची दादागिरी सहन केली जाणार नाही.
तशी कुणी अरेरावी केल्यास व्यापारी संघटितपणे ते मोडून काढतील." यावेळी मोहन पाटील, तुलसीदास पाटील, शिवप्रसाद जंगम, दीपक जाधव, दिनेश पोरवाल, विकास राजमाने, उदय इटकरकर, राजेंद्र फल्ले, नितीन फल्ले, विजय कारंजकर, बाहुबली वाकळे, रणजीत शहा, गोपी कोठारी, राहुल साळी, अनुज अग्रवाल, संदीप वाळवेकर यांच्यासह अन्य व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.