इस्लामपूर : येथील कोळी मळा परिसरातील विवाहिता राजनंदिनी सरनोबत यांचा काल विहिरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडून झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू नसून तो खून असल्याचे उघडकीस आले आहे. काल (ता. १९) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. काल रात्री उशिरा राजनंदिनी हिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय २९, रा. कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजनंदिनी यांच्या माहेरचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत (वय २६, रा. रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजनंदिनीला पहिल्या दोन्ही मुलीच झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. एक मुलगी दोन ते अडीच वर्षांची तर दुसरी मुलगी अवघी सहा महिन्यांची आहे. या रागातून कौस्तुभ याने रविवारी (ता. १८) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाण्याचा बहाणा करत पत्नीला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्याच्या दिशेने घेऊन गेला. कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या एका शेतात नेले.
तेथे संदीप पाटील व विनायक पाटील यांच्या सामायिक मालकीच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत राजनंदिनीला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल पोलिसांत माहिती देताना मात्र हा मृत्यू लघुशंकेसाठी विहीर परिसरात गेल्यानंतर पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे कौस्तुभ याने पोलिसांना सांगितले होते. राजनंदिनी यांच्या नातेवाईकांनी मात्र हा घातपात असल्याची शंका व्यक्त करत पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी कालपासूनच लावून धरली होती. उत्तरीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.