अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले.
कोल्हापूर : आमदार- खासदारांना पेन्शन (Pension) मिळते, मग आम्हाला का नाही? सरकार आमच्याशी लबाडी करते. आम्हाला मानधन नको, वेतन द्या, अशा मागण्या करून आज अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Worker) जेलभरो आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाचे नेतृत्व सतीशचंद्र कांबळे यांनी केले.
अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या २२ दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. नागपूर येथील अधिवेशनावरही मोर्चा काढण्यात आला. त्यानंतरही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर सरकारने तोडगा काढला नाही. आज अंगणवाडी सेविका महावीर गार्डन येथे एकत्र आल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) निदर्शने केली.
‘वेतन आमच्या हक्काचे’, ‘दहा रुपयाची अंबाडी, सरकार करते लबाडी’ अशा घोषणा देऊन सेविकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न देता त्यांच्याकडून राबवणूक करून घेत आहे. खरेतर किमान वेतन कायद्याचे पालन न केल्यामुळे या सरकारवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने, मोर्चे, संप केले तरी देखील आमच्या मागण्या गेंड्याच्या कातडीचे हे सरकार मान्य करत नाही.
तुटपुंज्या मानधनावर सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहे. मानधन या गोंडस नावाखाली फसवणूक करत आहे.’ या वेळी शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, शोभा महाडिक, अर्चना कांबळे, वर्षा लवटे, भारती बोलाईकर, आकाताई पाटील, रेखा पाटील, विद्या प्रभावळे, वैशाली चव्हाण, जयश्री बंगडे, भारती चव्हाण, पूजा पडळकर, उषा मगदूम, बनाबाई वाडकर यांच्यासह आंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे सेविका आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेतले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नव्हे, तर वेतन देण्यात यावे. सरकारी वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या अंतिम निकालानुसार सरकारी वेतनश्रेणी, महिला निर्वाह निधी, महागाई भत्ता, ग्रॅच्युईटी, पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत. प्रत्येक सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार वेतनवाढ देण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या निम्मी पेन्शन देण्यात यावी व तसा कायदा करावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.