बुधवारी कोल्हापूर बंदचा इशारा; सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या पाच मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी
Maratha Community
Maratha Communitysakal

कोल्हापूर : खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या पाच मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी, याकरिता सकल मराठा समाजाने शासनाला उद्यापर्यंत (ता. २८) अल्टिमेटम दिला आहे. मंगळवारपासून (ता. १ मार्च) आंदोलनाचा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा देत बुधवारी (ता. २) कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय समाजाच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक झाली.

यावेळी वसंतराव मुळीक म्हणाले, ‘संभाजीराजे यांच्या उपोषणाची दखल सरकारने वेळीच घ्यावी. लोकभावना तीव्र होत असून, ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पुकारले जात आहेत. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. २०१६ पासून मराठा समाजातील तरुणांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. समाजाच्या संतापाचा कडेलोट होत असून, जिल्ह्यात उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील.’

अॅड. राजेश कडदेशमुख म्हणाले, ‘राजे एकटे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, आता परिस्थिती चिघळत आहे. सरकारने मागण्यांसाठी विलंब करू नये. मंगळवारनंतर कार्यकर्ते त्यांच्या मार्गाने आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. हातकणंगले, कणेरी, हळदी येथे आंदोलन सुरू होत आहे. त्यामुळे शासनाने मागण्यांची अंमलबजावणी उद्यापासूनच करावी.’

गणी आजरेकर म्हणाले, ‘राजांच्या उपोषणाला दोन दिवस पूर्ण होत आहेत. नाशिक व फलटण येथे बंदची हाक देण्यात आली असून, ग्रामीण भागातील गावेही बंद होत आहेत. त्यामुळे कोल्हापुरातही आंदोलन तीव्र करण्याची गरज निर्माण झाली आहे. राजे आपल्या कोल्हापुरातील आहेत आणि कोल्हापूरकर शांत का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो.’दिलीप देसाई म्हणाले, ‘सरकारला आंदोलन हाणून पाडायचे आहे. त्यामुळे हिंसक आंदोलनापेक्षा शांततेने आंदोलन करूया.’

प्रसाद जाधव यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांचा संयम सुटल्यावर त्यांना आवर घालणे कठीण होईल, असे स्पष्ट केले. कादर मलबारी यांनी आंदोलनाचे कोणी राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन करत समाजाचा अंत आता कुणी पाहू नये; अन्यथा मंत्र्यांच्या घरांना घेराव घातला जाईल, असा इशारा दिला. सचिन तोडकर यांनी सरकारने राजेंना फसविल्याचा आरोप करून कोल्हापूरातून उग्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला शाहीर दिलीप सावंत यांनी राजेंच्या प्रकृती बिघडली तर सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.

बैठकीतील मुद्दे..

  • संभाजीराजेंच्या भेटीला मंत्री का नाही गेले

  • गल्लोगल्ली मराठा समाज आंदोलन करणार

  • जिजाऊ ब्रिगेड आंदोलन तीव्र करणार

रिक्षाचालकांची आज फेरी

संभाजीराजे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी रिक्षाचालकांतर्फे उद्या (ता. २८) दसरा चौकातून दुपारी बारा वाजता फेरी काढण्यात येणार आहेत. आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी महापालिका ते दसरा चौक असा फेरीचा मार्ग राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com