कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील काकडा प्रज्वलित करण्याच्या विधीला आजपासून प्रारंभ झाला. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे हा विधी होणार आहे. या विधीनुसार मशालीच्या मंद उजेडात पहाटे अडीचच्या सुमारास मंदिराच्या शिखराच्या टोकावर काकडा (तुपात भिजवलेली मोठी पेटती ज्योत) प्रज्वलित केला जातो. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या पहाटे काकडा विधीला प्रारंभ होतो.
मंदिराचे शिखर साधारणपणे चाळीस फूट उंच आहे. एवढ्या उंच शिखरावर केवळ शिखराच्या दगडी टप्प्यांचा आधार घेत मुख्य शिखराकडे पाठ करून चढावे लागते. एका हातात पेटता काकडा व दुसऱ्या हाताने दगडी टप्प्याला धरत शिखरावर एका दमात पोहोचावे लागते. बोचऱ्या थंडीत हा पेटता काकडा हातात घेऊन मंदिराच्या शिखरावर चढण्यासाठी एक वेगळेच कसब असावे लागते.
आजपासून हा विधी सुरू झाला असून देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदार मुनीश्वर, संजय जाधव-कसबेकर, संतोष खोबरे, रोषणनाईक निवास चव्हाण, ऐश्वर्या मुनीश्वर आदी या सोहळ्यात सहभागी झाले.
नव्या पिढीने कसब केले आत्मसात
सुमारे तीस ते पस्तीस वर्षे सुबोध बापट हा काकडा चढवत होते. मात्र, गेल्या काही वर्षात नवी पिढी या विधीसाठी तयार झाली असून, मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबऱ्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा उघडला जातो. त्यानंतर देवीची पहाटेची काकड आरती होते. या काळात देवीचा अभिषेक पहाटे साडेपाच व सकाळी साडेअकराला होतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.