कोल्हापूर : पंचगंगेसाठी सरसावल्या महिला संघटना

पाण्याच्या वापराबाबत करणार जागृती; वाहतूकदार संघटनांचाही सक्रिय सहभाग
Women and transporter Association
Women and transporter Association sakal

कोल्हापूर : तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ’च्या पुढाकाराने होणाऱ्या ‘पुन्हा साथ देऊया, चला, पंचगंगा वाचवूया’ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत विविध महिला संघटनांसह तनिष्का गटांच्या प्रतिनिधींनी कमीत कमी पाणी वापराचा निर्धार व्यक्त केला. केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर आपापल्या गल्लीत, अपार्टमेंट, सोसायटीत जनजागृती व कृती कार्यक्रमांवर भर देण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, शहर आणि परिसरातील विविध वाहतूकदार संघटनांनीही या मोहिमेत सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगितले.

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी मोहिमेचा उद्देश सांगितला. पंचगंगा प्रदूषणाची सद्य:स्थिती आणि थेट पाईपलाईनने पाणी आल्यानंतर पुन्हा वाढणारे सांडपाणी लक्षात घेता आतापासूनच प्रदूषणमुक्तीबरोबरच कमीत कमी पाण्याच्या वापरावर भर देणे आवश्यक असून समाजातील सर्व घटकांचे सक्रिय योगदान महत्त्‍वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी मोहिमेविषयी माहिती दिली. २१ एप्रिलला पिरळ (ता. राधानगरी) येथून राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीला प्रारंभ होईल. २२ एप्रिलला सकाळी सात वाजता पंचगंगा घाटावर सर्व कोल्हापूरकर एकवटतील. तेथे घाटाची स्वच्छता मोहीम आणि जलसंवर्धन प्रतिज्ञा होईल. त्यानंतर सायंकाळी इचलकरंजी येथेही अशाच पद्धतीने कार्यक्रम होईल, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर म्हणाल्या, ‘पंचगंगेबरोबरच पंचगंगा घाटाची अवस्थाही वाईट आहे. शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असून घाटावर वाहने लावली जातात आणि तेथेच अंघोळ, कपडे धुण्यावर भर दिला जातो. अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे. जैववैद्यकीय कचऱ्याचा प्रश्नही गंभीर असून त्याबाबत महापालिकेने कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

उमा बनछोडे यांनी जयंती नदी स्वच्छतेला पुन्हा प्रारंभ व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. घरातील सांडपाणी परिसरात निर्गत केले पाहिजे, सांडपाणी कमीत कमी निर्माण होईल, यासाठी दक्षता घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पद्माराजे महिला संघटना, तनिष्का गटप्रमुख सरिता सासने यांनी साखर कारखान्यांचे नदीत मिसळणारे पाणी थांबले नाही तर कारखान्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

असोसिएशनचे सचिव हेमंत डिसले, सल्लागार विक्रम पाटील, प्रकाश भोसले, आराम बस वाहतूक संघटनेचे दिलदार मुजावर यांनीही विविध सूचना केल्या. राजश्री चव्हाण, दीपाली जाधव, ज्योती काशीद, सरिता सुतार, सुनील काळे, मंगला काळे, राजश्री सावळे आदी उपस्थित होत्या. मुख्य बातमीदार निवास चौगले यांनी आभार मानले.

राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी वर्ष

कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, ‘राजर्षी शाहूंच्या दूरदृष्टीमुळे अजूनही आपल्याला स्वच्छ व मुबलक पाणी मिळते. त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष साजरे होत असताना पंचगंगेसाठी सर्वांनी मिळून एकत्रित काम केले पाहिजे. या मोहिमेतून प्रबोधनाबरोबरच कृती कार्यक्रमांवरही भर द्यायला हवा. काही वर्षे नदीतील वाळू उपसा न झाल्यानेही प्रदूषणात वाढ झाली असून त्याबाबतही योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com