कोल्हापूर : जिल्हा परिषद मतदारसंघ पुनर्रचनेचे काम जोरात सुरू झाले आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींमुळे काही मतदारसंघात बदल होणार आहेत. तर करवीर आणि कागल तालुक्यातील लोकसंख्येचा विचार करता या दोन तालुक्यातील प्रत्येकी एक नवीन मतदार संघ अस्तित्वात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवीन मतदारसंघ कसा असणार व कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. तर ज्या मतदारसंघात बदल होणार आहेत त्या ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. नव्याने होणारा गावांचा समावेश, तेथील राजकीय परिस्थिती आणि त्याचा फायदा कोणाला, याचेही गणित आत्तापासूनच मांडले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मतदार संघांची पुनर्रच्चना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार गावोगावी याबाबत सूचना देऊन गावागावातील भौगोलिक बदल, लोकसंख्या याची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर नवीन मतदार संघ आकाराला येतील. जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले, आजरा, हुपरी आदी नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येची गावे कमी झाल्याने या ठिकाणी मतदारसंघामध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे ज्या मतदार संघात ४० हजारपेक्षा अधिक लोकसंख्या आहे अशा गावांचा समावेश शेजारील मतदार संघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोणते गाव कोणत्या मतदारसंघात गेले तर कोणाला फायदा होईल? या गावांचा तोटा कोणाला होणार? याबाबतही जिल्हा परिषदेत चर्चा सुरू झाली आहे.
जातीचे दाखले काढण्यासाटी धावपळ
जिल्हा परिषदेचे सध्या ६७ मतदार संघ आहेत. यामध्ये नव्याने कागल व करवीर तालुक्यातील दोन मतदारसंघांची भर पडणार आहे. त्यामुळे नवीन सभागृहात ६९ सदस्यांचा समावेश असणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर आरक्षण पडणार आहेत. जिल्हा परिषद मतदार संघातील मागील चार आरक्षणांचा विचार करून कोणते आरक्षण पडणार, याचा अंदाज घेतला जात आहे. त्यादृष्टीने जातीचे दाखल काढण्यासाठी सदस्यांची धावपळ सुरू आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.