कोल्हापूर: कोरोना काळात बंद असलेली कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस कालपासून पूर्ववत सुरू झाली. मात्र, या रेल्वेला विशेष रेल्वे असे नाव दिले. पहिल्याच दिवशी 945 प्रवाशांसह रेल्वे मुंबईला रवाना झाली. काल रात्री पावणेनऊ वाजता ही विशेष रेल्वे मुंबईकडे रवाना झाली.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरातील रेल्वेसेवा नियमित प्रवासासाठी बंद होती. त्यानंतर कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउन शिथिल केला, तेव्हा मुंबई मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेसची सेवा काही दिवस चालू होती. नंतर तीही दोन महिन्यांपूर्वी संसर्ग टाळण्यासाठी बंद केली. त्यामुळे बहुतांशी प्रवाशांना खासगी व वाहतुकीचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी होऊ लागली.
प्रवाशांनी केली पूजा; 945 प्रवासी रवाना
मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्यापर्यंत रेल्वे प्रवाशी संघटनेने मागणी पोहचविली. त्यानुसार त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वेळेतच विशेष रेल्वे सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कालपासून ही सेवा सुरू झाली. या विशेष रेल्वेमध्ये आज स्लीपर कोचला 616, तर द्वितीय श्रेणी शयनयान कक्षासाठी 26, तर तृतीय श्रेणीतून 81, तर जनरलमधून 222 प्रवाशांनी जागा आरक्षित केल्या होत्या. रेल्वेची प्रवासी क्षमता 1204 आहे. यातील सरासरी 79 टक्के प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.