पुणे, मुंबईहून कागल, बेळगावला जाणारे आणि बेळगावहून पुणे मुंबईला जाणाऱ्या वाहतूकदारांचे प्रचंड हाल झाले.
कोल्हापूर : सहाशे पोलिसांचा बंदोबस्त आणि पहाटेपासून सुरू असणारी कार्यकर्त्यांची धरपकड झुगारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल (गुरुवार) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) तब्बल आठ तासांचे चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असली तरीही अवजड वाहनांची कऱ्हाडपर्यंतच्या दुतर्फा रस्त्यांवर रांगाच-रांगा पहायला मिळाल्या.
पुणे, मुंबईहून कागल, बेळगावला जाणारे आणि बेळगावहून पुणे मुंबईला जाणाऱ्या वाहतूकदारांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला दाद न देणाऱ्या शासन आणि प्रशासनाने हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संतप्त हुंकार अनुभवला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुकारलेल्या चक्का-जाम (Sugarcane Rate Chakka Jam Andolan) आंदोलनस्थळी संघटनेचे मुख्य पदाधिकारी येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी पहाटेपासूनच त्यांची धरपकड सुरू केली. संघटनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही, पोलिसांचा बंदोबस्त चुकवत हजारो कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोचले. सकाळी १०: ३० वाजल्यापासून सांगली फाटा येथून दोन-दीड किलोमीटर आणि तावडे हॉटलेपासून १ किलोमीटर चालत आंदेालनस्थळी पोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्याआधी सकाळी दहाच्या सुमारास १०० पोलिस अधिकारी आणि ६०० पोलिस तैनात केले होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो ऊस उत्पादकांनी सकाळी ११ नंतर महामार्गावरील शिरोली पुलावर भर उन्हातच ठिया मारला. यावेळी, एकही कार्यकर्ता तोडगा निघेपर्यंत रस्त्यावरून बाजूल हटला नाही. सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने महामार्गावर शेतकरी बसून होते. जसा वेळ जाईल तशा संतापाच्या भावना व्यक्त होत होत्या. तोडगा निघत नसल्याने उत्पादक आक्रमक झाले.
सकाळी अकरा वाजल्यापासून दिवसभर उन्हामध्येच शेतकरी बसून होते. तोडगा निघेल अशी अपेक्षा होती; पण दिवसभर कारखाना पातळीवरून किंवा शासनाने तोडगा काढला नाही. काही कारखानदार गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसास शंभर रुपये प्रति टन देण्यास तयार झाले. मात्र, काही कारखाने अडून बसले.
अखेर काल सायंकाळी चार वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि उत्पादकांमध्ये उत्साह आला. याच वेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत कारखानदारांची बैठक घेण्याची तयारी दर्शवली. यानंतर सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.