इस्लामपूर (जिल्हा सांगली) : शहरातील भुयारी गटर योजनेच्या कामांमुळे रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न 'खास बाब' म्हणून निकाली निघाला आहे. मंत्री जयंत पाटील यांनी त्यासाठी शासनाकडून वेगळा अध्यादेश काढून रस्त्यांच्या कामांना मान्यता मिळवून दिली आहे. यामध्ये सहा कोटी ५६ लाख रुपयांच्या सुमारे ५० कामांना मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते संजय कोरे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, सभापती विश्वनाथ डांगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ते म्हणाले, "भुयारी गटर योजनेत समाविष्ट असलेल्या तसेच ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे अथवा जिथे योजना झालेली नाही अशा ठिकाणच्या सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. योजनेचे काम झालेल्या ठिकाणीही दुरवस्था आहे. ७ फेब्रुवारी २०१८ ला शासनाच्या नगर विकास विभागामार्फत काढलेल्या आदेशामध्ये ज्या ठिकाणी रस्ते खोदावे लागतील त्या ठिकाणची कामे पूर्ण होईपर्यंत रस्त्यांची कोणती कामे केली जाऊ नयेत, असा आदेश काढला होता. याबाबत नगरपालिकेच्या २ मे २०२१च्या सर्वसाधारण सभेमध्ये शासनाने या कामांना केलेली अडवणूक थांबवून या अटींमध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी आम्ही केली होती.
राष्ट्रवादीने याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. पालिकेच्या सभेत तसा ठरावही केला होता. भुयारी गटार योजनेच्या कामाला होणारा विलंब व रस्त्यांची दयनीय अवस्था विचारात घेऊन ही कामे सुरू करावीत या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. तीन मे २०२१ ला पालिकेतून एक पत्र तयार करून घेऊन मंत्री पाटील यांच्याकडे पत्र दिले होते. भुयारी गटार योजना आणि चोवीस बाय सात योजना यामुळे रस्त्यांच्या कामांना जे निर्बंध होते ते निर्बंध उठविण्याचा निर्णय मंत्री पाटील यांच्या प्रयत्नातून झाला आहे. यामुळे अडकलेल्या सुमारे पन्नास रस्त्यांची कामे तातडीने सुरू होणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.