

कोल्हापूर : नशीब बलवत्तर असले की कितीही मोठी आपत्ती आली तरी निभाव लागतो, याचा प्रत्यय आज गोकुळ शिरगावच्या ओढ्यावरील पुलावर आला. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या कामगाराला स्थानिक तरुणांनी प्रयत्नांची शर्थ करून वाचविले. त्याचा बचाव करताना दोन वेळा तो प्रवाहात पाडला; पण देव तारी त्याला कोण मारी, या उक्तीप्रमाणे त्याचे प्राण वाचले. संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. सुरेश असे या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कर्नाटकचा आहे. येथील औद्योगिक वसाहतीत तो कामगार आहे.