कर्नाटकातील 'या' हुतात्म्यांचे बलिदान महाराष्ट्र सरकार वाया जाऊ देणार नाही
बेळगाव, ता. 1 : कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांचे बलिदान महाराष्ट्र सरकार वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी हुतात्मादिनी पत्रक जाहीर करून तसेच ट्विट करून कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले आहे. कर्नाटक सरकारने गोकाक अहवाल मान्य केला. या अहवालानुसार कर्नाटकातील सर्व शाळांमधून कन्नड शिकविणे अनिवार्य होते. हा अहवाल आल्यानंतर मराठी माध्यमांच्या शाळेतसुद्धा कन्नड विषय सक्तीचा करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. हा निर्णयामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. सीमाप्रश्न प्रलंबित असताना सीमाभागाचे कानडीकरण करण्याचा डाव असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
मराठी विद्यार्थी कन्नड भाषा शिकतील, त्यानंतर मराठी चळवळ आपोआप कमी होईल, असा मनसुबा कर्नाटक सरकारचा होता, म्हणूनच मराठी भाषिकांनी या भाषा धोरणाचा विरोध केला. यासाठी महाराष्ट्रातून नेते मंडळींनी पुढाकार घेतला आणि कन्नड सक्ती विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय कोल्हापूर येथे झालेल्या परिषदेत घेण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे नेते एस. एम. जोशी यांच्या आदेशानुसार शरद पवार यांनी 1 जून 1986 रोजी गणिमीकाव्याने चन्नम्मा चौकात झालेल्या कन्नड सक्ती विरोधी सत्याग्रहाला सुरवात केली. तत्कालीन शिवसेना नेते व सध्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी वेषांतर करून या आंदोलनात सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव बंदी असली तरी गणिमीकाव्याने बेळगावमध्ये येवून हा सत्याग्रह यशस्वी केला, त्यामुळे प्रशासन खवळले. त्यांनी शरद पवारांसह इतर नेत्यांना अटक केली. यामध्ये माझाही समावेश होता. दीड महिना बेळ्ळारीतील तुरुंगात तुरुंगवास भोगला. यावेळी सर्वच मराठी नेत्यांना अटक होताच परिस्थिती अधिक गंभीर बनली, लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागली. बंद पाळण्यात आला पण पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढण्याचे ठरविले आणि त्यांनी आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात नऊ जण हुतात्मा झाले. गेल्या काही वर्षात कर्नाटक राज्याकडून सीमाभागात लादलेली कन्नड सक्ती पाहता हे आंदोलन महत्त्वाचे होते हे आपल्या लक्षात येते, असे त्यांनी पत्राद्वारे मत व्यक्त केले आहे.
ट्विटरवरून हुतात्म्यांना अभिवादन
महाराष्ट्राचे ग्राम विकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह सीमावासीयांसाठी सातत्याने पाठीशी असणाऱ्या मंगेश चिवटे यांच्यासह अनेकांनी हुतात्मादिनी ट्विट व इतर माध्यमातून हुतात्म्यांना अभिवादन केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.