"यासाठी' करा जानेवारी अखेरपर्यंत ई-बालभारती पोर्टलवर नोंदणी

"यासाठी' करा जानेवारी अखेरपर्यंत ई-बालभारती पोर्टलवर नोंदणी

सोलापूर ः शिक्षण विभागाच्यावतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने जानेवारीच्या अखेरपर्यंत ई-बालभारती पोर्टलवर पुस्तकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. पहिली ते पाचवीसाठी प्रती लाभार्थी 250 तर सहावी ते आठवीसाठी प्रती लाभार्थी 400 रुपयांची पुस्तकांसाठी तरतूद केली जाते. केंद्र शासनाने समग्र शिक्षा अभियानाचे वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीबाबत केंद्राकडून सूचना मिळालेल्या नाहीत. मात्र, त्या सूचनांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या पुरवण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. 

यु-डायस प्लस 2018-19 या माहितीच्या आधारे जानेवारीअखेरपर्यंत इ-बालभारती पोर्टलवर शाळांनी आपली माहिती भरायची आहे. ही माहिती भरताना शिल्लक असलेली पुस्तक संख्या वजा करायची आहे. ती संख्या वजा करूनच विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची मागणी नोंदविण्याचे आवाहन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक डॉ. अश्‍विनी जोशी यांनी केले आहे. 2019-20 ची विद्यार्थीसंख्या व 2020-21 ची विद्यार्थी संख्या यामध्ये तफावत असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ज्यांना कमी पुस्तके मिळतील त्यांना ती पुन्हा देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्याला लागणाऱ्या पुस्तकांची मागणी ई बालभारतीच्या पोर्टलवर करण्याचे आवाहनही डॉ. जोशी यांनी केले आहे. 

वेळेवर पुरवठा होणे गरजेचे 
नव्या शैक्षणिक वर्षाच्या शाळा जून महिन्यात सुरू होतात. त्याचवेळी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जातात. ती पुस्तके देण्याचे नियोजन जानेवारी महिन्यापासून सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळणे आवश्‍यक आहे. परंतु अनेकवेळा विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके दिली जात नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके देण्याचा केवळ गाजावाजा केला जातो. मात्र, पहिल्या सत्रापर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळत नसल्याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. ज्याप्रमाणे पुस्तकांची स्थिती आहे तीच स्थिती गणवेशांचीही आहे. दिवाळीनंतर काही शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हे सगळे टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com