ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार

ब्रेकिंग : सातारकरांना टाेलमाफ हाेणार ? पालकमंत्र्यांचा पुढाकार

सातारा ः प्रवाशांना, वाहनचालकांना आणि नागरिकांनी सोयीसुविधा देता येत नसतील तर टोल बंद करा, तसेच टोलनाक्‍यापासूनच्या 20 किलोमीटर अंतरातील रहिवाशांना टोल माफी असते हे जाहीर करा आणि कोणत्याही परिस्थिती जिल्ह्यात आणखी टोल नाका येऊ देणार नाही, अशा शब्दात आज पालकमंत्र्यांसह खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रोखठोक भूमिका मांडली. दरम्यान, महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत 15 मार्चपर्यंत रस्ते व्यवस्थित करून नागरिकांना सुविधा द्या आणि त्याचा अहवाल त्याच दिवशी द्या, अशी सूचना रिलायन्सच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली.
 
महामार्गावरील समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महामार्गाचे अधिकारी आणि रिलायन्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिरवळनजीक जिल्ह्यात आणखी एक टोलनाका आणण्याचा घाट घातला जात आहे; पण हा टोल नाका होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वांनी मांडली. खंडाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी अनेक प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या आहेत. टोलनाका आला, की अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत टोलनाका होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका आमदार मकरंद पाटील यांनी मांडली, तसेच महामार्गावरील समस्या चित्रफितीद्वारे रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्यात आल्या. त्यावर रिलायन्सचे अधिकारी व्यवस्थित उत्तरे देऊ शकले नाही. खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ""लोक सुविधांचे पैसे देतात. मात्र, त्याकडे राजरोस दुर्लक्ष केले जात आहे. टोलनाक्‍यावरील लोक वाहनचालकांशी उद्धटपणे वागतात. लोकांचा अपमान करून मारहाण होते. हे योग्य नाही. लोकांचा अपघातात नाहक जीव जात आहे. त्याचे गुन्हे तुमच्यावर दाखल केले पाहिजेत.'' 

हेही वाचा : सातारकरांनाे सावधान! जे शनिवारात घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल

बाळासाहेब पाटील म्हणाले, ""नागरिकांचा प्रवास सुरक्षितच झाला पाहिजे. त्यासाठी रिलायन्सने तातडीने पावले उचलली पाहिजेत. टोलनाके मुळातच चुकीच्या पद्धतीने उभारले आहेत. जिल्ह्याच्या प्रारंभास नाके उभारले गेले पाहिजे होते. केवळ कंपनीच्या फायद्यासाठी जिल्ह्यात मध्येच टोलनाके उभारले आहेत.'' आवश्‍यक तेथे ओव्हरब्रीजही तातडीने उभारावेत, अशी सूचना मकरंद पाटील यांनी केली. 15 मार्चपर्यंत रस्ते व्यवस्थित करून नागरिकांना सुविधा द्या आणि त्याचा अहवाल 15 मार्चलाच द्या, असे रिलायन्सच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुनावले. 

जरुर वाचा : आता खुले मतदानच घ्या

महाबळेश्‍वर ते धामणेर, धामणेर ते विटा असे रस्ते केले जात आहेत. त्या रस्त्याबाबतच्या तक्रारी पालकमंत्री पाटील, आमदार महेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मांडल्या. या रस्त्यांच्या कामासाठी सर्वत्र खोदकाम केले आहे. तेथेच खोदलेली माती टाकली आहे. पावसाने ती पुन्हा रस्त्यावर येणार आहे, तसेच धुळीचा त्रास होत असूनही त्यावर पाणी मारले जात नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. त्याबाबत आता योग्य ती कार्यवाही करू, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टोलमाफीची अंमलबजावणी करा 

टोलनाक्‍यानजीकच्या गावातील लोकांना टोल माफ असतो. त्याबाबतचा नियम काय आहे ते सांगण्याची सूचना पालकमंत्र्यांनी करताच रिलायन्सच्या प्रतिनिधींनी टोलनाक्‍यापासून 20 किलोमीटर अंतरातील नागरिकांना टोलमाफ असतो, असे सांगितले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे आमदार पाटील यांनी लक्षात आणून दिले. हा नियम तातडीने सर्वांना कळावा, यासाठी प्रसिद्धीस द्यावा, अशी सूचना या वेळी पालकमंत्र्यांनी केली.

नक्की वाचा : खेड शिवापूर टोल नाका बंदची शिफारसच नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com