सातारा : खातेवाटप लवकरच जाहीर होईल. त्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील आणि मी एकत्रितपणे जिल्ह्यातील कोणते प्रश्न प्रलंबित आहेत, कोणती विकासकामे झाली पाहिजेत, यावर चर्चा करून समन्वयातून विकासाचा समतोल साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या अर्थसंकल्पातूनही जिल्ह्यास भरघोस निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
"सकाळ' कार्यालयास भेट
"सकाळ'च्या येथील कार्यालयास श्री. देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर, जाहिरात व्यवस्थापक संजय कदम व संपादकीय सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न, रखडलेले प्रकल्प, प्रशासकीय स्थिती, जिल्ह्याच्या विकासासाठी काय बदल होणे अपेक्षित आहे, यांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली.
हेही वाचा : हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत
सर्वांना विचारातून घेऊन विकासकामे
श्री. देसाई म्हणाले, ""जेव्हा तालुक्याचा प्रश्न असतो, तेव्हा गोष्ट वेगळी. पण, जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही एखादा विषय पुढे नेतो, तेव्हा सर्व लोकप्रतिनिधी विकासासाठी एकत्रितपणे काम करतो, ही जिल्ह्यातील चांगली बाब आहे. यापुढेही सर्वांना विचारातून घेऊन जिल्ह्यात विकासकामे होतील. जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि मंत्री पाटील एकत्रितपणे चर्चा करून, त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत पाठपुरावाही करू. वैद्यकीय महाविद्यालय, सातारा शहराची हद्दवाढ, अपूर्ण सिंचन प्रकल्प, एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.''
रेंगाळलेले विषय महिनाभरात मार्गी
खातेवाटप लवकरच होईल. अनुभवी मंत्री गतीने कामकाज सुरू करतील. तसेच नवे मंत्रीही खात्यांचा अभ्यास करून कार्यवाही सुरू करतील. आगामी अधिवेशनात, अर्थसंकल्पात त्याची झलक दिसून येईल. खातेवाटप लांबल्याने रेंगाळलेले विषय महिनाभरात मार्गी लागतील. पाटणमध्येही उद्योग, रोजगाराच्यादृष्टीने काही प्रयत्न करत असल्याचे श्री. देसाईंनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या अनेक समस्या आहेत. सामान्यांशी एसटीची जोडलेली नाळ तुटू न देता त्यांना अधिकाधिक सोयी पुरवण्यासंदर्भात लवकरच एसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. विशेषत: सातारा ते पुणे प्रवासाबाबत लोकांच्या असणाऱ्या तक्रारी जिल्ह्यासाठी हितावह नाहीत. सातारा- पुणे बससेवा फायदेशीर असतानाही, सातारा आगारातून त्याचे योग्य व्यवस्थापन आणि जनसामान्यांचे हित राखले जाणे अपेक्षित आहे. त्यासाठीही प्राधान्य देणार आहे, असेही श्री. देसाईंनी आश्वासित केले.
आवश्य वाचा : आदित्य यांनी घेतला ‘शिवालया’चा ताबा
मी लगेच मतदारसंघात दाखल
राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी लगेच मतदारसंघात दाखल झालो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी जबाबदारी माझ्यावर देतील, ती पार पाडेन. पालकमंत्री, सहपालकमंत्री याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी घेईल, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगातील घडामोडी, त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि ताण-तणावातूनही मिळालेला आत्मविश्वासाचा अनुभव यावरही त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.