बोगस खताचे प्रकरण : २० एकरावरील द्राक्ष बागा किटकनाशकांमुळे जळाल्या

कासेगाव, तनाळी येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान
vineyards were burned by pesticides Loss of farmers solapur
vineyards were burned by pesticides Loss of farmers solapursakal

पंढरपूर : माढा तालुक्‍यातील बोगस खताचे प्रकरण ताजे असतानाच आता पंढरपूर तालुक्‍यातही बोगस रासायनिक किटकनाशकांचा प्रकार समोर आला आहे. अप्रमाणित रासायनिक कीटकनाशक औषधांमुळे कासेगाव व तनाळी (ता. पंढरपूर) येथील अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा जळू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अप्रमाणित औषधांची विक्री करणाऱ्या कंपनी आणि स्थानिक विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.

मुंबई येथील एमको पेस्टीसाईड रासायनिक किड व किटकनाशक औषधांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीचे पायरी बन या औषधाची कासेगाव व तनाळी भागातील अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष झाडाच्या खोडावर धुरळणी केली होती. त्यानंतर आता द्राक्षाची फळे आणि झाडावर दुष्परिणाम दिसू लागला आहे. या औषधामुळे कासेगाव व तनाळी या परिसरातील जवळपास २० एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेला मोठी हानी पोहोचली असून यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे २ ते ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्याच आठवड्यात माढा तालुक्‍यातील बावी येथे बोगस खतामुळे काढणीस आलेले द्राक्ष घड वाळून गेल्याचा प्रकार समोर आला होता. यावर खत तयार करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. त्यानंतर बोगस किटकनाशक औषधांची विक्री केल्याचा संतापजनक प्रकार पंढरपुरात उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन कासेगाव परिसरात घेतले जाते. येथील शेतकरी सुनील गवळी, शिवाजी अलदर यांनी फायरी बन या किटकनाशका मात्रा द्राक्ष झाडाच्या खोडाला दिली होती.

त्यानंतर दहा दिवसांनी द्राक्ष घड आणि झाडे वाळू लागल्याचे समोर आले आहे. येथील शेतकरी सुनील गवळी यांची पाच एकर सुपर सोनाका द्राक्ष बाग आहे. त्यांनी मिलीबग रोग प्रतिबंधक म्हणून पायरी बन या औषधाची मात्रा झाडांना दिली होती. त्यानंतर त्यांची संपूर्ण पाच एकर बागेतील द्राक्ष घड वाळून गेले आहेत. यामध्ये त्यांचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर ही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. हातातोंडाशी आलेली बाग औषधामुळे जळू लागल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत.

बोगस औषधे शेतकऱ्यांच्या माथी

मागील काही दिवसांपासून पंढरपूर व परिसरात बोगस औषधे तयार करुन ती शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे सर्रास प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बोगस खते आणि औषधांमुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पंढरपूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात देखील अप्रमाणित खते आणि औषधे तयार करुन त्याची बिनबोभाट महागड्या दराने विक्री केली जात आहे. अशा खत तयार करणाऱ्या बोगस कंपनीच्या ठगांवर कृषी विभागाने कारवाई करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

शेतकऱ्यांनी औषधांचे नमूने खासगी प्रयोगशाळेत तपासणी पाठवले होते. त्यामध्ये अप्रमाणित औषध असल्याचा अहवाल मिळाला आहे. येथील कृषी विभागाने संबंधित औषधाचे नुमने आणि द्राक्ष बागेतील घड पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित औषध कंपनी आणि विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- विजय मोरे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com