केत्तूर (सोलापूर) : शेंगा तेलाच्या दराने द्विशतक गाठले आहे, तर दुसरीकडे डाळींच्या दरानेही शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरिबांचे जगणे मुश्किलीचे झाले आहे. खाद्य तेलाच्या दरात वरचेवर वाढ होत असल्याने सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना विना तेलाच्या चपात्या व भाज्या खायच्या का, असा प्रश्न सतावू लागला आहे.
शेंगदाणा तेलाबरोबरच पाम तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, सरकी तेल अशा सर्व प्रकारच्या खाद्यतेलांचे दर वरचेवर वाढतच आहेत. देशात सुमारे 75 टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते. तर आपल्या देशात 30 ते 35 टक्के खाद्यतेल तयार होते. परंतु गतवर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे खाद्य तेलाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. खाद्य तेलाची दरवाढ थांबायचे नावच घेत नसल्याने सर्वसामान्यांचे जगणे मात्र अवघड झाले आहे.
खाद्य तेलापाठोपाठच बाजारात सर्वच डाळींची आवक मंदावल्याने व मागणी वाढल्याने डाळींचे दरही वाढता वाढता वाढत आहेत. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे डाळींच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता. डाळीने शंभरी पार केली असून आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या रमजान सणासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स तसेच खसखस याचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे व्यापारी सुहास निसळ यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
खाद्यतेलाचे दर
शेंगा तेल : 200 ते 210
सूर्यफूल तेल : 190
सोयाबीन तेल : 170
पाम तेल : 150
डाळींचे दर
तूर डाळ : 110 ते 115
मूग डाळ : 110 ते 115
उडीद डाळ : 110 ते 120
हरभरा डाळ : 70 ते 75
मसूर डाळ : 75 ते 80
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.