लातूर : पिकांच्या काढणीनंतर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक सुरू होते. त्यानंतर शेतीमालाचे भाव घसरतात. तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकरी शेतीमालाची विक्री करतात. कालांत्तराने शेतीमालाचे भाव वाढतात. या भावाचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो.
हा फायदा शेतकऱ्यांना करून देण्यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने सुरू केलेल्या शेतीमाल तारण योजनेचा लाभ जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी घेत आहेत. यातूनच सरलेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांनी ७४७ शेतकऱ्यांना सुमारे नऊ कोटी ४३ लाख ७३ हजार ८८५ रूपये कर्जाचे वाटप केले आहे. यातील व्याजातून समित्यांना उत्पन्नाचे एक नवीन साधनही उपलब्ध झाले आहे.
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एस. आर. नाईकवाडी यांनी ही माहिती दिली. दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनसाठी शेतीमाल तारण योजनेचा प्रारंभ बुधवारी (ता. तीन) लातूर बाजार समितीच्या वतीने दोन ठिकाणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ही योजना पणन मंडळाच्या वतीने अनेक वर्षापासून राबवण्यात येत आहे.
मात्र, योजनेची माहिती शेतकरी तसेच बाजार समित्यांना नव्हती. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष पाटील यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा जिल्ह्यात योजनेचा प्रारंभ झाला. त्यानंतर ही योजना एकानंतर एक बाजार समित्यांनी सुरू केली. योजनेत शेतीमाल तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमालाच्या चालू बाजार भावाच्या ७५ टक्के कर्ज दरसाल दरशेकडा सहा टक्के व्याजाने सहा महिने मुदतीचे देण्यात येते.
योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. योजनेत साठवणूक केल्यामुळे शेतीमाल सुरक्षित रहातो तर दुसरीकडे सहा टक्के व्याज दराने सहा महिने मुदतीचे कर्जही उपलब्ध होते. कर्जातून शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजा भागवता येतात तसेच सहा महिन्यांनी वाढणाऱ्या शेतीमालाच्या भावाचा फायदाही मिळतो. सहा महिन्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यानंतर त्यातून कर्जाची परतफेड करून वाढीव भावाचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत असून बाजार समित्यांकडून मात्र, विशिष्ठ शेतकऱ्यांचा योजनेचा लाभ देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यात समित्यांचे पदाधिकारी व त्यांचे नातेवाईकांनाच योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येत असल्याचेही प्रकार घडत आहेत. यामुळे योजनेचा लाभ तोंड पाहून न देता सर्वांना देण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
बाजार समित्यांना व्याजातून उत्पन्न
योजनेत कर्ज वाटप करण्यासाठी बाजार समित्यांना कृषी पणन मंडळाकडून मागेल तेवढा निधी देण्यात येतो. मात्र, जिल्ह्यात लातूर व उदगीरसह काही बाजार समित्यांकडे स्वतःचा निधी आहे. बहुतांश बाजार समित्या पणन मंडळाकडून निधी न घेता स्वतःच्या निधीतूनच योजनेतील कर्जाचे वाटप करत आहेत.
निधी असताना पणन मंडळाकडून तो घेण्याची गरज नाही. यामुळे या योजनेतून बाजार समित्यांना व्याजाच्या उत्पन्नाचे चांगलेच साधन उपलब्ध झाले आहे. मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांनी स्वतःच्या निधीतून नऊ कोटी ४१ लाख १८ हजार ८८५ रूपयाचे कर्ज वाटप केल्याचे जिल्हा उपनिबंधक नाईकवाडी यांनी सांगितले.
लातूर बाजार समितीची आघाडी
योजनेत सुरवातीपासूनच लातूर बाजार समितीने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात समितीने सर्वाधिक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. समितीच्या वतीने लातूर व मुरूड येथे दोन ठिकाणी योजनेत शेतीमालाची साठवणूक करण्यात येते. मागील वर्षात समितीने ५५६ शेतकऱ्यांच्या २१ हजार ३६ क्विंटल शेतीमालाच्या तारणावर सहा कोटी ३१ लाखाचे कर्ज वाटप केले.
औसा समितीने ८१ शेतकऱ्यांना साडेतीन हजार क्विंटलसाठी एक कोटी सहा लाख, उदगीर समितीने १३१ शेतकऱ्यांना सहा हजार दोनशे क्विंटलसाठी दोन कोटी ६१ लाख, अहमदपूर समितीने १७ शेतकऱ्यांना एक हजार क्विंटलसाठी २९ लाख तर चाकूर समितीने सहा शेतकऱ्यांना २१२ क्विंटलसाठी सहा लाखाचे कर्ज वाटप केल्याचे श्री. नाईकवाडी यांनी सांगितले. सहा बाजार समित्यांनी मागील वर्षात ही योजना राबवली नाही.