Mohol News : 'भीमा'ची पहिली उचल 2,525 रुपये, उपपदार्थ निर्मिती कमी असूनही ऊस दराची कोंडी फोडण्यात यश

भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाची पहिली उचल म्हणून प्रति टन 2 हजार 525 रुपये जाहीर.
Vishwaraj Mahadik
Vishwaraj Mahadiksakal

मोहोळ - टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाची पहिली उचल म्हणून प्रति टन 2 हजार 525 रुपये जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सहविज निर्मिती वगळता कुठलीही उपपदार्थ निर्मिती नसताना ऊस दराची कोंडी फोडणारा भीमा हा एकमेव कारखाना ठरला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

या संदर्भात माहिती देताना अध्यक्ष महाडिक म्हणाले, चालू वर्षीचा संपूर्ण पावसाळा कोरडा गेला, ऊसाला पाणी मिळाले नाही, त्यामुळे उसाची वाढ झालीच नाही. उसाच्या वजनात ही मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

दरम्यान ता. 23 ऑक्टोबर रोजी भीमा कारखान्याचा चालू गळीत हंगामातील बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा व मोळी पूजन करण्यात आले होते. त्यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खा. महाडिक यांनी चालू गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल म्हणून प्रति टन 2 हजार 400 रुपये जाहीर केली होती.

मात्र सध्या बाजारातील वाढलेले साखरेचे दर, न पडलेला पाऊस, उसाच्या वजनात होणारी घट व शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका याचा विचार करून संचालक मंडळाच्या बैठकीत 2 हजार 525 रुपये देण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार एक नोव्हेंबर पासून गाळपास येणाऱ्या उसाला पहिली उचल वरील प्रमाणे देण्यात येणार आहे.

डिजिटल वजन काटा

अनेक शेतकऱ्यांनी गेल्या गाळप हंगामात कारखानदार उसाचा काटा मारतात अशा तक्रारी साखर आयुक्त कार्यालयाकडे यापूर्वी केल्या होत्या. गेल्या वर्षी भीमा कारखान्याची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत भिमाचे तत्कालीन अध्यक्ष खा. महाडिक यांनी शेतकऱ्यांनी कुठल्याही काट्यावर आपल्या उसाचे वजन करावे व नंतर भीमाच्या काट्यावर करावे एक किलोचा जरी फरक पडला तर एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते.

चालू वर्षी शासनाने डिजिटल वजनकाटे बसविण्याचा आदेश सर्व कारखान्यांना दिला आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी भिमाने सर्वात अगोदर केली आहे. कारखान्यातील सर्व वजन काटे डिजिटल केले आहेत. तर 80 टन वजनाचा नवीन वजनकाटा कार्यान्वित केला आहे.

सभासदाला आपल्या उसाचे वजन किती झाले हे समजण्यासाठी मुख्य कार्यालय परिसरात मोठे 'स्क्रीन' लावण्यात येणार आहे. तर नवीन एसएमएस प्रणाली सुरू केली आहे. जेणे करून वजनाचा मेसेजही मोबाईलवर शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. उत्पादक शेतकऱ्यांनी दर, वजन या गोष्टी विचारात घेऊन सर्व पिकवलेला ऊस भीमा कारखान्यालाच गाळपासाठी द्यावा असे आवाहन अध्यक्ष महाडिक यांनी शेवटी केले.

यावेळी कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, सर्व खाते प्रमुख, संचालक उपस्थित होते. शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतल्याने यावेळी अध्यक्ष महाडिक यांचा विविध संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com