सोलापूर : फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी व मध्यस्थांच्या नफेखोरीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी श्रीकांत कोठावळे यांनी फळ संकलन व विक्रीची साखळी निर्माण करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा हिस्सा वाढावा यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. राज्यातील विविध भागात या कंपनीचा विस्तार केला जात आहे.
तुळजापूर तालुक्यातील मूळचे रहिवासी असलेले श्रीकांत कोठावळे यांनी वडाळा येथील लोकमंगल बायोटेक्नॉलॉजी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. नंतर शेती व्यवसायाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास केला. फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवरील अनेक मुद्दे समोर आले. एकतर शेतकऱ्याला त्याचा माल सरसकट द्यायचा असतो. त्याला सर्व मालाला सारखा भाव मिळायला हवा आहे.
तसेच मध्यस्थांच्या नफ्याचा हिस्सा हा उत्पादकांच्या वाट्याला येणे आवश्यक आहे. पण फळ बाजारात मध्यस्थ व दलालांची साखळी उत्पादकांना लाभ मिळू देत नाही, हे लक्षात घेत श्रीकांत कोठावळे यांनी विशाल टाके व सोमनाथ जुगदार यांना सोबत घेत युवा किसान शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे 2500 पेक्षा अधिक शेतकरी, फळ उत्पादक गट सदस्य म्हणून काम करतात.
ई-कॉमर्स उद्योजक, फळ प्रक्रिया उद्योजक, मोठे खरेदीदार, निर्यातदार आदींसाठी शेतकऱ्यांचा माल पोचवण्याचे काम ही कंपनी करत आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी कोरोनाच्या काळात स्थापन करून देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या कंपनीने उत्कृष्ट व ताजी फळे ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे. त्यासाठी कंपनीने विविध भागात फळ खरेदी केंद्रे स्थापन केली. तसेच देशातील विविध भागात माल पाठवण्याचे काम सुरू केले.
ठळक बाबी
2500 पेक्षा अधिक शेतकरी व उत्पादक गट हे कंपनीचे सदस्य
कंपनीकडून डाळिंब, द्राक्ष, हापूस आंबा, केशर आंबा, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ, ऍपल बोरची खरेदी
तासगाव, इंदापूर, सासवड, सांगोला येथे खरेदी केंद्रे
मुंबई, हैदराबाद व दिल्ली येथे वितरण केंद्रे
पुणे, बंगळूर, कोइमतूर, विजयवाडा, कोलकता, चेन्नई, इंदोर, लखनौ, अहमदाबाद येथे विक्री सुविधा
बिग बझार, रिलायन्स फ्रेश, हायपर मार्केट यांसारख्या अनेक मॉलसाठी फळ पुरवठा
दलालांची साखळी तोडून उत्पादकांना फायदा
ग्राहकांपर्यंत ताजी फळे पोचवण्याचे काम
शेतकऱ्यांना त्यांच्या फळांचा मोबदला अधिक मिळावा व ग्राहकांना ताजा माल मिळावा, हा हेतू समोर ठेवत आम्ही काम करत आहोत. उत्पादकांना मध्यस्थी टाळल्याने जादा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.- श्रीकांत कोठावळे, संचालक, युवा किसान एफपीसीएल
या कंपनीने उत्कृष्ट व ताजी फळे ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे. त्यासाठी कंपनीने विविध भागात फळ खरेदी केंद्रे स्थापन केली. तसेच देशातील विविध भागात माल पाठवण्याचे काम सुरू केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.