बेळगाव ः स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार असल्यामुळे महापालिकेने दिवसातून दोनवेळा स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार सर्व सफाई ठेकेदारांनी 25 डिसेंबरपासूनच ही मोहीम हाती घेतली आहे. पण, महापालिकेने केवळ पाहणी दौऱ्यावेळी दोनवेळा स्वच्छता न करता ही यंत्रणा कायमस्वरुपी राबवावी, अशी लोकांची मागणी आहे.
हे पण वाचा - कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर
स्वच्छ सर्वेक्षणासाठी 4 जानेवारीपासून पाहणी दौरे सुरु होतात. त्यासाठी केंद्रीय नगरविकास खात्याकडून पथक नियुक्त केले जाते. यंदाही पथक नियुक्त करण्यात आले आहे. पण, ते अद्याप बेळगावात आलेले नाही. पथक पाहणी करून गेल्यानंतरच दिवसातून दोनवेळा सुरु असलेली स्वच्छता मोहीम बंद होईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे एकदाच म्हणजे सकाळच्या वेळेत स्वच्छता होईल.
हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
स्वच्छ सर्वेक्षणाच्या दुसऱ्या तिमाहीत बेळगावने 82 व्या स्थानावर झेप घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा अंतिम निकाल मार्च किंवा एप्रिलमध्ये जाहीर होतो. त्यासाठीची पाहणी जानेवारीत होते. अंतिम निकालात बेळगावचे स्थान पहिल्या शंभर शहरांत असावे यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठीच स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय पथकाला शहरात कचरा किंवा ब्लॅक स्पॉट दिसू नयेत यासाठी ठेकेदारांना कडक सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे, ठेकदारांकडून दिवसातून दोनवेळा कचऱ्याची उचल केली जात आहे. एका ठेकेदाराने तर तीनवेळा उचल व दोन वेळा स्वीपिंग सुरू केले आहे. या पथकाकडून शहरातील लोकांशीही संवाद साधला जात असल्याने लोकांनीही पथकाला योग्य माहिती द्यावी, यासाठी जागृती फलक लावण्यात आले आहेत. पण, शहर स्वच्छतेची हीच तत्परता महापालिकेकडून वर्षभर दाखविली जाणार का, हा प्रश्न आहे.
हे पण वाचा - मुख्यमंत्र्यांसह शिवकुमार संकटात;अडचणी वाढणार
आरोग्य निरीक्षकही व्यस्त
शहर स्वच्छतेसाठी दहा ठेकेदार आहेत. काही प्रभागांची स्वच्छता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. या सर्वच प्रभागांमध्ये दोनवेळा स्वच्छता केली जात आहे. आरोग्य निरीक्षकांना त्या स्वच्छता कामावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. शहरात काही ठिकाणी ब्लॅक स्पॉटही हटविण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे, ठेकेदार व आरोग्य निरीक्षकही सध्या या कामात व्यस्त आहेत.
|