moshi.jpg
moshi.jpg

कारभारीण गिरणीच्या रांगेत, तर कारभारी...

मोशी : आज सोमवारी (ता.13) मध्यरात्रीपासून पुढील दहा दिवसांसाठी लाॅकडाउन सुरु होत आहे. घरामध्ये अत्यावश्यक असलेल्या वस्तू खरेदीसाठीचा आजचा शेवटचा एक दिवस होता. त्यामुळे कुटुंबातील महिलांनी किराणा खरेदीसह धान्य दळण्यासाठी गिरणीमध्ये धान्याच्या पिशव्यांची रांग लागली होती तर दुसरीकडे याच अशा काही कुटुंबातील घरधन्यांनी मोशीतील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या एका वाईन शाॅप समोर रांगा लावल्या होत्या. हे सर्व पाहून  "कुणाला कशाचे पडले आहे तर कुणाला कशाचे पडल आहे?" अशीच चर्चा मोशी परिसरातील नागरीकांमध्ये होती.

पुढील दहा दिवसांसाठी कडक लाॅकडाउन सुरु होत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आणि अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांमध्ये एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे नागरिकांनी मोशी गावठाण, पुणे - नाशिक महामार्ग, मोशी देहू व मोशी आळंदी बीआरटी रस्ता, जाधववाडी लिंक रस्ता, स्पाईन रस्ता, बारणे वस्ती, बो-हाडे वाडी, आल्हाट वाडी, बनकर वाडी, सस्ते वाडी, सावतामाळी नगर, मोशी प्राधिकरण मधील पेठ क्रमांक 4, 6, 9 आदी परिसरातील किराणा, भाजीपाला, फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


गृहिणींच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले भाकरी व चपात्या करण्यासाठी लागणारे पीठ मिळविण्यासाठी या गृहिणींनी परिसरातील विविध गिरण्यांमध्ये धान्य दळण्यासाठी गर्दी केली होती. मात्र गिरणीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी गिरण्यांमध्ये आपले धान्य ठेवण्यात आले होते. अन्य साहित्यांप्रमाणेच गिरण्यांमध्येही या धान्यांच्या पिशव्यांचे ढीग लागल्याचे दिसून येत होते. याबाबत एका गिरणी मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, "जेव्हा पासून लाॅकडाउन सुरु होणार असल्याचे जाहीर झाले. तेव्हापासून माझ्या गिरणीत गृहिणींनी विविध प्रकारचे धान्य दळण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, येथे गर्दी होऊ नये म्हणून मी प्रत्येकींना चार तासांनी या असे सांगून हे सर्व प्रकारचे धान्य ठेवून घेतल्याने येथे धान्याच्या पिशव्यांच्या रांगा लागल्या आहेत. लाॅकडाउनच्या काळात काही भाजीपाला विक्रेते अन्य जीवनावश्यक साहित्यासह जास्तीच्या दराने विकतात. मात्र, आम्हा गिरणीमालकांना तसे करता येत नाही तर ते नेहमीच्या दरानेच दळण दळावे लागते."

 फळे व फळभाज्या विक्रेत्यांनी केली लूट....
 मोशी परिसरातील गावठाण, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, स्पाईन रस्ता, जाधववाडी लिंक रस्ता, मोशी प्राधिकरण आदी परिसरातील पदपथांवर अनधिकृतपणे फळे व फळभाज्या विक्रेत्यांनी ग्राहकांची अडवणूक करत अव्वाच्या सव्वा दरात विक्री केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. इतर वेळी  100 ते 120 रुपये किलो दर असलेले संत्री 180 ते 200 रुपये, 140 ते 150 रुपये किलो दर असलेले सफरचंद 200 किलो, 35 ते 40 रुपये दर असलेले शहाळे 45 ते 50 रुपये दराने तर 10 ते 15 रुपये दर असलेली कोथिंबीर 40 ते 50 रुपये, कांदा, बटाटा, कोबी, फ्लाॅवर यांसारख्या फळभाज्याही जादा दराने विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.'

Edited by- Gayatri Tandale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com