वीज नसल्याने ऑनलाइन स्टडीचे वाजले बारा; नोकरदारही वैतागले!

Electricity-Issue
Electricity-Issue

पिंपरी - वाकड, पिंपळे निलख, विशाल नगर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून सदनिका विकत घेतल्या आहेत. परंतु या सोसायट्यांमध्ये पुरेसा विद्युत पुरवठाच होत नाही. त्याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर होत आहे. आठवड्यातील पाच दिवसदेखील अखंड वीज पुरवठा होत नसल्याने मुलांचा "ऑनलाइन स्टडी'चे बारा वाजले आहेत, दुसरीकडे "वर्क फ्रॉम होम' करणारा नोकरदारवर्ग वैतागला आहे. या सदनिकाधारकांना पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा कधी होणार? हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. यावर महावितरणकडून ना ठोस कार्यवाही, ना उपाययोजना निव्वळ आश्‍वासने मिळत आहेत, अशा तक्रारी नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. येत्या महिन्याभरात या तक्रारींचे निवारण न झाल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सोसायटीधारकांनी दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी, पिंपळे सौदागर, कस्पटेवस्ती, काळेवाडी , रहाटणी, थेरगाव, रावेत अशा परिसरात 350 सोसायट्या आहेत. स्थानिक नगरसेवक तुषार कामठे व नगरसेविका आरती चौंधे यांनी महावितरणच्या संदर्भात पिंपळे निलख येथील कै. वामनराव जगताप विरंगुळा केंद्रात "जनता दरबार' भरविला होता. यावेळी महापौर उषा ढोरे, महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रेय बालगुडे, सहाय्यक अभियंता रत्नदीप काळे, सनी टोपे, अभय केदारी, महावितरण समिती सदस्य गोरखनाथ अमराळे उपस्थित होते. 

या मांडल्या समस्या 
अखंडित वीजपुरवठा, उघड्या डि.पी., अवाजवी आलेले वीजबिल, तुटलेल्या केबल्स, आरएमयु युनिटची उपयुक्तता शून्य, महावितरणचे अधिकारी - कर्मचारी फोन उचलत नाहीत. रस्ते खोदाई, जुन्या ट्रान्सफॉर्मरचे तपासणी न करणे, चुकीचे रीडिंग, पावसामुळे विद्युत पुरवठा प्रमाणात वाढ याविषयावर नागरिकांनी समस्या मांडल्या. 

नागरिकांच्या तक्रारी 
तेजस्विनी ढोमसे म्हणाल्या, 'वर्षानुवर्षे महावितरणची समस्या कायम आहे. केवळ बैठका होत आहेत, ठोस कार्यवाही झालेली नाही. महावितरणने ग्राहकांची वीजबिल कमी केले पाहिजे. याउलट अधिकचे दरवाढ करून वाढीव बिल देत आहेत.'' 

सचिन लोंढे म्हणाले, 'आयटी हब परिसर असल्यामुळे सगळीकडे वर्क फ्रॉम वर्क सुरू आहे. परंतु वारंवार वीज गेल्यामुळे आयटीयन्सच्या नोकऱ्या धोक्‍यात आल्या आहेत. '' 

गोविंद गायकवाड म्हणाले, 'रीडिंग न घेता मागील बिल दिले आहे. 800 युनिट वापर दाखविला आहे. अधिकारी फोन उचलत नाहीत. दररोज वीज खंडित होत आहे.'' 

कुसुम दांडेकर म्हणाल्या, 'ऑनलाइन वीजबिल भरूनही अडीच हजार रुपये बिल आले आहे.'' 

मगनलाल दाणेज म्हणाले, 'मीटर बंद पडल्याची तक्रार अकरा महिन्यापूर्वी केली आहे. अद्याप मीटर बदलून दिले नाही.'' 

करमचंद गर्ग म्हणाले, 'मुंबईच्या धर्तीवर आयलॅंडिग इफेक्‍टची सुविधा महावितरणने द्यावी.'

सुदेश राजे म्हणाले, "मोठ्या प्रमाणात डीपी उघड्या आहेत.' 

हेमचंद श्रीकुरील म्हणाले, 'दररोज पाच ते दहा तास वीजगुल होते. कर्मचाऱ्यांना काहीच सांगता येत नाही.'' 

आशिष माने म्हणाले, 'तक्रार करून वीज पुरवठा पूर्ववत होत नाही. रात्री बेरात्री वीज गायब होते.'' 

सोमनाथ ढोरे 'तीन वर्षापूर्वी अशीच बैठक घेतली होती. पण काहीच प्रगती झाली नाही. किंबहुना समस्येत भर पडली.''

तक्रारींचा पाऊस पडूनही, अधिकारी कोरडेच 
दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बहुतांश नागरिक अंधारात असतात. तरीही वाढीव बिल येत आहेत, याबाबत तक्रारींचा पाऊस पडूनही "महावितरणचे' अधिकारी मात्र कोरडे होते. अनेक समस्यांचे उत्तरच न सापडल्याने अधिकाऱ्यांनी महिनाभराचा कालावधी मागितला आहे. 

आमदारांची पाठ, महापौरांचे आश्‍वासन 
या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप यांना आमंत्रित केले होते. परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहिले नाहीत. मात्र महापौर ढोरे यांनी तासभर चाललेल्या बैठकीत सगळ्यांचे प्रश्‍न ऐकून घेतले. समजून घेतले आणि ते सोडविण्यासाठी प्रशासन पातळीवर सर्व मदत कार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com