
Kranti Din : अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेत्या, भारत छोडो आंदोलनातील वीरांगना आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी.अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचं पूर्वीचे नाव आहे. त्यांचा जन्म १६ जुलै १९०९ रोजी पंजाबमधील कालका शहरात एका श्रीमंत बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. पुढे हे कुटुंब कलकत्ता शहरात स्थायिक झाले.
अरुणा या स्वतंत्रपणे विचार करण्याऱ्या होत्या. डोळ्यांवर झापडं लाऊन पारंपरिक मार्गाने वाटचाल करणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रथम लाहोरच्या ख्रीस्ती मिशनरी शाळेत व नंतर नैनितालच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या गोखले कन्या पाठशाळेत अध्यापनाचे काम केले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने २३ वर्षे मोठे असलेल्या सुप्रसिद्ध मुस्लिम वकील असफ अली यांच्याशी १९२८ ला आंतरधर्मीय विवाह केला. त्यांच्या या आंतरधर्मीय विवाहाला अरुणा यांच्या कुटुंबियाचा विरोध होता.
असफ अली हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमधील प्रमुख सदस्य होते. त्यामुळे विवाहानंतर अरुणा देखील काँग्रेसमध्ये आल्या. आणि खऱ्या अर्थाने येथूनच त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कारकिर्दीला सुरुवात झाली. महात्मा गांधी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्या अनेक प्रचार सभा, प्रभातफेर्या यांमध्ये सहभागी होत आणि त्याठिकाणी दमदार भाषण देखील देत.
१९३० व १९३२ साली जी कायदेभंग चळवळ झाली त्यात व वैयक्तिक सत्याग्रहात अरुणा सहभागी झाल्या. सत्याग्रहात सहभागी झाल्या म्हणून त्यांना तुरुंगात देखील जावे लागले. यावेळी त्यांनी एक निश्चय केला की आता आयुष्याच्या शेवटपर्यंत अंगावर खादीचे कपडे घालायचे आणि त्यांनी तो निश्चय तसाच पाळला.
त्यानंतर पुढे काही दिवसांतच गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची हाक दिली. आणि मग अरुणा यांनी या सत्याग्रहात मोठ्या हिरहिरीने सहभाग नोंदवला. आणि हळूहळू मग अरुणा सत्याग्रहात सक्रिय होऊ लागल्या. जसे की मीठ बनविणे, मिरवणुका काढणे, सभा भरविणे अशी सगळी कामे करू लागल्या. त्या हे अशाप्रकारचे काम करतायत म्हटल्यावर ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पुन्हा खटला भरला. यानंतर त्यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
गांधी-आयर्विन करारानुसार अनेक राजकीय कैद्यांना सोडून दिले होते. पण अरुणा यांना मात्र सोडण्यात आले नाही. त्यांची एवढी भीती इंग्रज सरकारने घेतली होती. त्यांना सोडले नाही म्हणून जनतेने प्रखर आंदोलने सुरू केली. या आंदोलनामुळे काही दिवसांनी त्यांची सुटका झाली पण १९३२ मध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठेवले व दोन हजार रुपयांचा दंडही सूनवला.
थोडक्यात काय तर १९३० ते १९४१ या कालखंडात अटक, कारावास व सुटका या गोष्टी सतत चालू होत्या.‘नुसते तुरंग भरून स्वातंत्र्य मिळेल’ ही गोष्ट पटेनाशी झाल्याने १९४२ मध्ये महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘भारत छोडो’ हा इशारा दिला.अरुणा यांनी त्यांना पकडायला आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्या चार वर्ष भूमिगत राहिल्या.पुढे १९४६ साली त्यांच्यावरचे अटक वॉरंट रद्द होताच त्या अचानक प्रकट झाल्या. (Kranti Din)
स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ साली त्या युनेस्कोच्या मेक्सिको येथील परिषदेत डॉ. रामकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून गेल्या.पुढे १९५६ मध्ये त्या दिल्लीच्या महापौर झाल्या.या काळात त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी प्रयत्न केले. भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’, तसेच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार (१९८७) देऊन त्यांचा गौरव केला. दिल्ली येथे त्यांचे २९ जुलै १९९६ रोजी निधन झाले. अरुणा यांनी ‘सोविएतलॅँड नेहरू पुरस्कार’, लेनिन पुरस्कार , इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सामंजस्याबदल ‘नेहरू पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.