
Bollywood Movie Review : अभिनेता सोनू सूदने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खलनायक म्हणून काम केले असले तरी कोरोना काळात त्याने गोरगरीबांना तसेच सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने सगळ्यांचा आवडता नायक बनला. एवढेच नाही तर त्याला मसिहा म्हणून उपाधी देण्यात आली. आता सोनू सूदने रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थी नायक म्हणून पाऊल टाकले आहे. एवढेच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही तो हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. फतेह असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. सस्पेन्स आणि भरपूर अॅक्शनने भरलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात सोनू सूद, जॅकलिन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह, विजय राज, दिब्येंदु भट्टाचार्य, बिन्नू ढिल्लों सारखे कलाकार आहेत.
मुळात एखाद्या अभिनेत्याने अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. आमिर खानपासून ते अजय देवगणपर्यंत आणि अलिकडे रणदीप हुड्डा ते कुणाल खेमूपर्यंत, असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. सोनू सूदनेदेखील या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम पेलल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना एका चांगल्या आणि आजच्या जमान्यातील एका ज्वलंत विषयाला त्याने हात घातला आहे. कारण आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सायबर गुन्हेगारी खूप वाढलेली आहे. कित्येक जण याचे बळी ठरलेले आहेत. हा चित्रपट सायबर गुन्हेगारीचा पर्दापाश करणारा आहे. विशेष बाब म्हणजे भविष्यात त्याच्या भयानक धोक्याबद्दल लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये अॅक्शनचा थरार आहे. चित्रपटातील अॅक्शन आणि एकूणच कथानकाची गती पाहता हा चित्रपट खिळवून ठेवणारा असाच झाला आहे. सोनू सूद, नसीरुद्दीन शाह, जॅकलिन फर्नांडिस, शिवज्योती राजपूत, विजय राज, शिबा चड्ढा, आकाशदीप आदी कलाकारांनी छान अभिनय केला आहे. सोनू सूदने फतेह सिंगच्या
भूमिकेचे बेअरिंग छान पकडले आहे. जॅकलिनने आपल्या वाट्याला आलेल्या सीन्सना चांगला न्याय दिला आहे. या
चित्रपटातील अॅक्शन सीन्स डोळे दिपवणारे झाले आहेत. संगीतदेखील ठीकठाक आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी झकास झाली आहे. मात्र चित्रपट सुरुवातीला काहीसा रेंगाळलेला झाला आहे. तसेच नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या सशक्त अभिनेत्याच्या भूमिकेला अधिक वाव देणे अपेक्षित होते. एक रोमांचक आणि थरारक असा अनुभव देणारा हा चित्रपट आहे. एक ज्वलंत विषय सुरेख मांडण्यात आला आहे.
साडेतीन स्टार