

Delhi Malviya Nagar Fire
esakal
एम. व्ही. देशमुख - directormfs@live.com
दिल्लीतील मालवीयनगर परिसरात लागलेली आग केवळ एका घटनेची बातमी नाही; तर ती आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे... आपण अजूनही सुरक्षेच्या बाबतीत किती निष्काळजी आहोत? दरवर्षी होणाऱ्या अशा दुर्घटना आपल्याला इशारा देतात; पण आपण तो किती गांभीर्याने घेतो? ‘चलता है’ ही मानसिकताच अनेक दुर्घटनांचे मूळ आहे.
दिल्लीच्या गजबजलेल्या मालवीयनगर परिसरातील एका अनधिकृत हॉटेलला नुकतीच लागलेली आग अनेक अर्थांनी आपल्या व्यवस्थेतील असंख्य त्रुटींकडे बोट दाखवते. एकंदरीत सुरक्षेसंदर्भातील आपल्या सामूहिक मानसिकतेवरही ती बोट ठेवते. आपल्या समाजात जबाबदारीची जाणीव आणि संवेदना फार कमी झाल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडली, की त्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यावर आपण आघाडीवर असतो. प्रत्यक्षात आपल्या घराची, इमारतीची आणि मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करणे, ही मालक आणि सोसायटीची प्राथमिक जबाबदारी आहे. इतरांनी सहकार्य केले नाही तरी स्वतःची जबाबदारी पार पाडणे आवश्यक असते.
दिल्लीतील प्रकरणात संबंधित इमारतीकडे आवश्यक परवाने आणि अग्निशमन विभागाची मंजुरीही नव्हती. मग असे हॉटेल सुरू कसे राहिले? त्यासाठी अग्निशमन विभाग, स्थानिक प्रशासन किंवा इतर संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चितच तपासली पाहिजे; मात्र दुर्घटना घडल्यानंतर परस्परांवर दोषारोप करून जबाबदारी झटकणे सोपे असते; पण त्यातून गेलेले जीव परत येत नाहीत.