

India Africa Relations
esakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
भारताची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे भारताबद्दल आफ्रिकी देशांना वाटणारा विश्वास. आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये एकाधिकारशाही असताना सर्वसामान्य जनतेला भारताच्या लोकशाहीचं आकर्षण आहे. पूर्व आफ्रिकी किनाऱ्यावरील देशांमध्ये असलेल्या लाखो भारतीय वंशाच्या लोकांमुळे आफ्रिकेशी भारताची नाळ जोडलेली आहे. अनिवासी चिनी नागरिकांनी चीनच्या आर्थिक प्रगतीत मोठा हातभार लावला. अमेरिकेत इस्राईलसाठी काम करणाऱ्या ज्यू लॉबीपुढे अमेरिकेतलं कोणत्याही पक्षाचं सरकार झुकतं. अगदी तसाच आफ्रिकेतल्या भारतीय वंशाच्या लोकांचा व्यापार, शिक्षण, गुंतवणूक वगैरेंबद्दलच्या निर्णयांमध्ये प्रभाव पडतो.
काही प्रदेश नेहमीच दुर्दैवी असतात. आफ्रिका खंड अशाच प्रदेशांपैकी. आफ्रिकेचं पूर्वांपार आकर्षण एवढं, की मेडिटरेनियन साम्राज्यापासून युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांपर्यंत अनेकांनी आफ्रिकेला लुटलं. युरोपिअनांनी लूटमार चालू ठेवण्यासाठी १८८४-८५ च्या बर्लिन परिषदेत अगदी पश्चिम आशियासारखीच आफ्रिका खंडाची कोणत्याही आफ्रिकी देशाला विचारात न घेता फाळणी करून टाकली. इतिहास कसा सूड घेतो बघा. ज्या आफ्रिकेचं शोषण करून स्पेनने अतोनात पैसे मिळवला, त्याच आफ्रिकेतून येणाऱ्या हजारो गरीब स्थलांतरितांचा प्रश्न स्पेनपुढे उभा राहिलाय. शीतयुद्धकाळात महासत्तांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आफ्रिकेचा वापर केला. पूर्वी भूप्रदेश, सोनं, धान्य वगैरेंसाठी जगाचं लक्ष असलेला आफ्रिका आज पुन्हा एकदा जागतिक भू-राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. या वेळेचं कारण आहे आफ्रिकेची तरुण लोकसंख्या, दुर्मीळ खनिजं, मोक्याचं भू-राजकीय स्थान, ऊर्जा आणि उगवणारी बाजारपेठ.